लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ३७० रुपयांच्या बिर्याणी वादाला नवे वळण मिळाले आहे. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या हिमांशू जांगडा याने आता संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली आहे. या वादामुळे नोकरी गमावलेला आणि गुन्हा दाखल झालेला हिमांशू सध्या प्रचंड मानसिक तणावातून जात असल्याचे त्याने सांगितले आहे.
हिमांशू हा गुरुग्राममधील एका नामांकित डिझाईन कंपनीत काम करत होता. ३७० च्या बिर्याणी वादानंतर त्याला कामावरून काढण्यात आले. त्या कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांच्याशी संवाद साधताना हिमांशूने आपल्या मनातील खंत व्यक्त केली. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे हा वाद आता त्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यापर्यंत पोहोचल्याचे त्याने सांगितले. गेल्या दोन आठवड्यांपासून इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचेही त्याने नमूद केले.
हिमांशूच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती नव्हती. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्समुळे ही बाब नातेवाईक आणि शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली. शेजाऱ्यांनी थेट घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना याबद्दल माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांनाही या वादाची माहिती मिळाली. यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी बोलावून त्याच्याशी चर्चा केली. आपण चूक केल्याचे मान्य करत कुटुंबाची माफी मागितल्याचे हिमांशूने सांगितले. मात्र नोकरी गेल्याचे कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांचं टेन्शन वाढलं.
हिमांशूने सांगितले की, हा त्याच्या आयुष्यातील पहिलाच लाईव्ह कॉमेडी शो होता. शोमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी पूर्णपणे सत्य नव्हत्या, तसेच त्या संवादाकडे आपण केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले होते, असा त्याचा दावा आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता कुटुंबीयांकडे पाहिल्यावर त्या शोमध्ये सहभागी झाल्याचा पश्चात्ताप होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, या वादानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून प्रकरणाची चर्चा अद्यापही सुरू आहे.


