जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील पिळोदा येथील एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केलीय. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने बँकेचं कर्ज व हातउसनवारीचे पैसे कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील पिळोदा येथील हिरालाल पंढरीनाथ सोनवणे (वय ३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पिळोदा येथे आई, भाऊ, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हिरालाल सोनवणे यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच गावात देखील काही जणांकडून उसनवारीने रक्कम घेतली होती. या पैशांसाठी हिरालाल यांच्यामागे तगादा सुरु झाला होता.
डोक्यावर कर्जाचा बोजा असताना शेतात टाकलेल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्न फारसे चांगले आले नाही. याशिवाय शेतमालाला देखील भाव मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत हिरालाल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याच विवंचनेत हिरालाल सोनवणे यांनी २६ जानेवारीच्या दिवशी घरात कोणी नसताना कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान सदर प्रकार कुटुंबियांना लक्षात आल्यानंतर हिरालाल यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. दोन दिवसांपासून उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास हिरालाल सोनवणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.