पोलिसांसह शासकीय यंत्रणा न पोहचल्याने आदिवासी बांधवांमध्ये संताप
दहिगाव ता यावल , लोकशा न्यूज नेटवर्क
येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या लगत निसर्गरम्य अशा निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 30 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. आसाराम शांतीलाल बारेला वय १५ व निमा किसन बारेला वय १० अशी मयताची नावे आहेत.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, नायगाव शिवारातील निमछाव गावठाण भागात रहिवास असलेल्या आदिवासी पाडा वस्तीतील आसाराम शांतीलाल बारेला व निमा किसन बारेला हे दोन्ही भावंडे म्हशीला पाणी पाजण्यासाठी निंबादेवी धरणामध्ये उतरले होते पाण्याचा अंदाज न समजल्याने म्हशीच्या मागोमाग दोघं बालके गेले आणि त्यातच एकाचा पाय घसरला त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला असता दुसराही बुडून त्यात मयत झाला. रात्री मुलाचा मृतदेह काढण्यात आला. तर 31 मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान मुलीचा मृतदेह आदिवासी बांधवांनी शोधून काढला दरम्यानच्या काळात कुठल्याही शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तिथे फिरकून बघितले नाही असा आरोप आदिवासी बांधव करीत आहेत . आसाराम हा इयत्ता नववी मध्ये वाघ जिरा आश्रम शाळेत शिक्षण घेत होता . तर निमा किसन बारेलाही निमच्या गावठाण येथे असलेल्या प्राथमिक शाळेतच इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत होती. दोघांची परिस्थिती गरिबीची आहे . दोघ कुटुंबीयांवर हा दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्व पाड्यातील आदिवासी बांधवांची तिथे गर्दी जमली होती.
निमछाव या गावठाण भागात गुरांना पाणी पाजण्यासाठी कुंड तयार केलेले आहे. त्या कुंडामध्ये पाणी सोडले जात नसल्याने तिथे पाईपलाईन खोदण्याचे काम चालू होते. एक दिवसासाठी धरणावर पाणी पाजण्यासाठी दोघं मुलं गेले होते. तिथेच हि दुर्घटना घडली असे आदिवासी बांधवांमधून सांगण्यात आले. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. हेड कॉन्स्टेबल संजय देवरे होमगार्ड जनार्दन महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.