राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्यास 2 मार्चपर्यंत मुदतवाढ…     

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पूर्वीच्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी, 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च, 2023 हा राहिल.

दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.aharashtra.gov.in  या संकेतस्थळावर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.gov.in या व http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर विनामुल्य उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 2 मार्च, 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य 2 मार्च, 2023 पर्यंत पाठवावे. असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाप्यावर/ पाकीटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. असेही सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.