लोकशाही न्यूज नेटवर्क

शिर्डीच्या साई मंदिराच्या गेटसमोर भयंकर हत्याकांडाची घटना घडली. साईबाब मंदिर परिसरात स्टिकर आणि फळे विकणाऱ्या महिलांच्या एका गटानेदुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेवर चाकूने वार करत तिची हत्या केली. रविवारी रात्री ही हत्येची घटना घडली. साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर भर गर्दीत महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयश्री साईनाथ क्षीरसागर (३० वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी २ फळ विक्रेत्या महिलांना शिर्डी पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, साई मंदिर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी चार ते पाच महिलांनीच दुसऱ्या महिलेवर धारदार चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. फळे विकण्यासाठी उभं राहण्याच्या किरकोळ कारणाहून झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत पोहचल्याची प्राथमिक माहिती आहे. भररस्त्यात आरोपी महिलांनी जयश्री यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली खांडीझोड (२२ वर्षे) आणि फिजा पटेल (२१ वर्षे) या दोन महिला आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिर्डीत आता तरुणांच्या टोळक्यांसह महिलांचा गुंडराज सुरू झालाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र गुंड प्रवृत्तीच्या काही महिला हातविक्रेत्यांमुळे साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत दोन महिलांना ताब्यात घेतलं. पोलिस सध्या तपास करत आहेत.


