
लोकशाही संपादकीय लेख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येथे चार महिन्यात घेण्याची तंबी न्यायालयाने दिल्यानंतर सर्वच पक्षात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महायुतीची सत्ता असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार. तथापि काही ठिकाणी भाजप स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले, तरी ऐनवेळी महायुती एकत्रितपणे लढण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आशा फार उंचावल्या आहेत. उमेदवारांच्या खिचातानीत ऐनवेळी प्रत्येक पक्ष ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सध्या भाजपात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग चालू असल्याने भाजपचे जुने एकनिष्ठ आणि नव्या येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस सुरू आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 2018 ला एकूण 75 नगरसेवकांपैकी 57 जागा भाजपने जिंकून मोठे बहुमत प्राप्त केले होते. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर भाजप मध्ये फाटाफूट होऊन शिवसेनेने सत्ता प्राप्त केली होती. त्यानंतर पुढे शिवसेनेतही फाटा फूट झाली, हा भाग वेगळा.
आता किमान 57 जागा भाजप लढवणार म्हणजे फक्त 18 जागा महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिल्या जातील. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 18 पेक्षा कमी जागा मान्य होतील का? राष्ट्रवादी भाजपाशी जुळवून घेईल तथापि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा असल्याने महापालिकेत जागांच्या वादांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यातील युती तुटण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद थोडीफार कमी असल्याने सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू त्यांची जळगाव महापालिकेतील युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे गट एकत्रित येऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. आगामी जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप शिंदेंची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिक मनसे अशाप्रकारे तीन पक्ष स्वतंत्रपणे लढत होईल असे चित्र दिसते आहे. 2018 मध्ये 75 पैकी 57 जागा जिंकून मोठे बहुमत प्राप्त करणाऱ्या भाजपच्या अशा उंचावल्या असल्या तरी त्यांना वाटते तितके हे सोपे सुद्धा नाही. महायुतीतील घटक पक्ष शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेच्या उमेदवारांकडून भाजप उमेदवारांचीच अडचण होणार आहे, एवढे मात्र निश्चित. जर ठाकरे बंधूंची युती झाली तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला ते महागात पडणार आहे. हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज लागणार नाही.
सध्या चार उमेदवार मिळून एक प्रभाग करण्याच्या हालचालींना वेग आला असला तरी ही प्रक्रिया ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जळगाव मनपाच्या निवडणुका 2026 च्या नवीन वर्षात होतील. येत्या सहा महिन्यात सत्ताधारी भाजप तर्फे महापालिकेत वर्चस्व स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न केले जातील तथापि सध्या भाजप कार्यकर्त्यांमधील नवे जुने कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला वाद आणि धुसफुस त्यांना सावरता सावरता भाजपला नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे भाजपला पक्षातील धुसफूस नडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार आणि मंत्री हे एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत. त्यांनी उघड उघड शिंदेजवळ आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्यात कितपत एकजूट राहील हे सांगता येणार नाही. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात निवडणुकीसाठी विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्रित लढण्यासाठी ठाकरे बंधूंचे मिलन होईल. त्यामुळे जळगाव सारख्या महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती झाली तर भाजपला ते चांगली टक्कर देऊ शकतात. परिणामी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक नवीन वर्षात होऊन त्यात तीन पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असे चित्र दिसते आहे…!

