लोकशाही संपादकीय लेख

राम मंदिर बांधण्यासाठी आणि त्यानंतर राम भक्तांनी श्रद्धेने अयोध्येतील रामाच्या विधिवत कार्यक्रमासाठी ज्या देणग्या दिल्या, त्यासाठी रोख रक्कम, चांदीच्या विटा, सोन्याच्या विटा, सोन्या-चांदीचे दागिने भक्तीपोटी दानपेटीत टाकले. त्यातील करोडो रुपयांची चोरी केली गेली. ज्या रामभक्तांनी श्रद्धेने देणग्या दिल्या, तितक्याच कठोरतेने त्या दानपेटीतील रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि मूर्त्या लांबविल्या गेल्या. ज्या राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवण्यात आला, त्या ट्रस्टनेच हा विश्वासघात केला. या पेटीत जे दान आले, त्याचा घोटाळा झाला असल्याची कुणकुण सहा महिन्यांपूर्वीच लागली होती. पण जे या मंदिराच्या ट्रस्टचे महासचिव आहेत, ते चंपत राय यांनी म्हटले होते की, आम्हाला याची कुणकुण मे महिन्यात लागली होती. आम्ही याबाबत अंतर्गत तपास करणार होतो. पण त्याआधी त्यांचा भांडाफोड झाला आणि चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
पंधरा दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी एसआयटी नेमली आणि या एसआयटीकडे त्याचा तपास दिला. एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा दानपेटीत पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच चोरी केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी काही कर्मचाऱ्यांकडे धाडी टाकल्या. तेव्हा मिनू यादव या कर्मचाऱ्याकडे ८० लाख रुपये रोकड सापडली. मिनू यादव हे मंदिराच्या ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे ड्रायव्हर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिनू यादव यांनी गेल्या काही वर्षांत जबरदस्त संपत्ती जमा केली आहे. पंधरा-वीस हजार पगाराच्या ड्रायव्हरकडे अगदी काही वर्षांतच स्वतःचा बंगला तसेच फॉर्च्युनर कार अशी संपत्ती जमा झाली. अशाप्रकारे आठ कर्मचारी एसआयटीच्या निदर्शनास आल्याने त्या आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सध्या पोलीस कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे.
एकूण ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक दानपेटीतील रोकड, दागिने, मूर्ती आदींची मोजदाद करण्यासाठी होती. आता असे निदर्शनास आले आहे की, दानपेटीतील दानाची मोजदाद करताना ही मंडळी बाथरूममध्ये काही दानाचा भाग लपवायची. यावेळी जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या टीमशी संगनमत करून त्यांना आपल्या टोळीत सामील केले होते. म्हणजे दानातील चोरी करणाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे त्या कालावधीत बंद ठेवले जात. त्यामुळे एसआयटी अथवा कोणतीही चौकशी झाली असती, तरी ते कॅमेऱ्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व कामकाज व्यवस्थित चालले आहे, असे कोणालाही वाटेल. परंतु वरून कीर्तन आणि आतून तमाशा, अशातला हा प्रकार चालला होता. हे कुणालाही माहीत नव्हते. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ४०० सिक्युरिटी नेमले होते. महिन्याला या सिक्युरिटीवर एक कोटी रुपये खर्च येत असे. म्हणजे वर्षाला १२ कोटी रुपये सिक्युरिटीवर खर्च होत असे. ही सिक्युरिटी पैशाची मोजदाद सोडून दुसरीकडेच काम करत असे. गर्दीच्या ठिकाणी या सिक्युरिटीचा वापर होत असे. अशा सूचनाच महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या होत्या. म्हणजे दानपेटीतील दानाच्या चोरीमागे वरिष्ठ ट्रस्टींचा आशीर्वाद होता, असे म्हणायला हरकत नाही.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील व संघ परिवारातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्याचबरोबर अनिल मिश्रा हे दुसरे ट्रस्टी, ज्यांचा यात सहभाग आहे, आणि गोपाळराव हे तिघे मिळून या दानाच्या रकमेच्या चोरीप्रकरणी आशीर्वाद देत होते, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अनिल मिश्रा यांचे नातेवाईक या दानपेटीतील चोरीमध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेत आणि त्यांनाही याप्रकरणी अटक झाली आहे. हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेकडो कोटी रुपयांची चोरी झाली असताना चंपत राय यांनी बाजूला होणे हे योग्य नाही. एसआयटीतर्फे चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळराव यांची चौकशी झालेली आहे. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, हे विशेष होय. या प्रकरणात एसआयटीची मुदत संपली असताना पंधरा दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. आणखी तपास बाकी आहे, म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुरुवातीला या राम मंदिर दानपेटीतील चोरी झालीच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे होते. परंतु त्याची उत्तर प्रदेशात सर्वदूर चर्चा सुरू झाल्याने त्यांनी एसआयटी स्थापन करून त्यांच्याकडे हे काम सोपवले. त्यात चांगलेच घबाड हाती लागले. या प्रकरणात चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळराव यांच्या व्यतिरिक्त आणखी काही भाजपचे नेते सामील आहेत काय, असा आरोप आमचे नेते केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे चोरीची पारदर्शक चौकशी होण्याची शक्यता नाही, असे केजरीवाल म्हणतात. परंतु या निमित्ताने यांची रामावरील श्रद्धा किती वेगळी आहे, हेच यातून दिसून आले. ज्या रामभक्तीच्या श्रद्धेपोटी कोणी पेन्शनची रक्कम दिली, तर कोणी लहान बालकांच्या खाऊची रक्कम दिली. कोणी पगारदार नोकराने आपल्या पगारातील हिस्सा दिला, तर बडे-बडे श्रीमंत लोकांनी चांदीची वीट, सोन्याची वीट दिली. कोणी दागिने दिले, तर कोणी मूर्ती दिल्या. अशाप्रकारे श्रद्धेने दिलेल्या रकमेची चोरी करताना त्यांचे हात कसे काय थरथरले नाहीत, हे यावरून दिसून येते. स्वार्थापुढे काहीही चालत नाही. हे तिघे ट्रस्टी आरएसएसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. तसेच हे तिघेही विश्व हिंदू परिषदेचे मोठे कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील सहकारी आहेत. आदित्यनाथ यांचेही ते विश्वासू आहेत. त्यामुळे जे चोरी करणारे पकडण्यात आले आहेत, ते तर प्यादे आहेत. खरे वजीर हे तिघेजण आहेत. या तिघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे. पण पंधरा दिवसांचा कालावधी गेला, तरी पंतप्रधान काही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे हे प्रकरण असेच दडपले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बडे मासे गळाला लागायला हवे, ते लागले पाहिजेत. पण तसे होताना काही संकेत मिळत नाहीत, हे दुर्दैवाने म्हणावे लागते.


