लोकशाही न्यूज नेटवर्क
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची तोफ महिनाभरानंतर कडाकली. आजारपणानंतर संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली अन् भाजप-शिवसेनेबाबत मोठा दावा केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. गेल्या काही दिवसांपासू संजय राऊत प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे प्रसारमाध्यमांच्या समोर आले नव्हते. ३० ऑक्टोबर रोजी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता. आता पुन्हा एकदा ते परत आले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा धुरळा उडाला आहे. प्रचारचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणुका लागल्यानंतर सत्ताधाऱ्यांमधील धूसफूस सर्वांसमोर आली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते फोडल्यामुळे मंत्री नाराज होते. शिवसेना नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली होती. शिवसेना-भाजप यांच्यातील कटुता दिल्ली पर्यंत पोहचली आहे. त्याशिवाय तळ कोकणातील राणे संघर्षाही चर्चेत राहिला होता. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची ही महिन्यापासून शांत बसलेली तोफ आज पुन्हा कडाडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे ते प्रसारमाध्यमांपासूनही दूर होते. पण आता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, माज्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होऊ मी पुन्हा येणार आहे. माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर निवडणुकांच्या प्रचारामध्ये नक्की फिरलो असतो.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आम्ही बोलणार नाही. त्यांचा कोथळा अमित शाह काढणार, हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढायचा प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे यांचे ३५ आमदार फुटणार आहेत. रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक त्यासाठीच केली आहे.
शिंदेंना वाटते दिल्लीचे दोन नेते पाठीशी आहेत. पण ते कोणाचेच नाहीत. एकनाथ शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे, अमित शहाने निर्माण केलेला गट आहे. यांनी कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात. पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
राज्यात उद्या मतदान होणार आहे. त्याआधी गुलाबराव पाटलांनी लक्ष्मी दर्शन होणार असल्याचे म्हटले. आता कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झाले, हे आयोगाने पाहिले पाहिजे. मला मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी दहा हजार आणि १५ हजार एका मतामागे दिले जात आहेत. राज्यात निवडणुकीच्या वेळी पैशांचा खेळ एवढा कधी झाला नव्हता. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या मुळात मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री लढवत नसतात, त्या स्थानिक पातळीवर लढत असतात.’