जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;
आकाश बाविस्कर…
जळगाव
देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची धूम सुरु असून, सर्वत्र देशप्रेमाची एकच लाट बघायला मिळत आहे. प्रत्येक नागरिक, हा महोत्सव कायमस्वरूपी स्मरणात राहावा यासाठी आपापल्या परीने प्रयत्नशील दिसून येत आहे. मग तो घरावर तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोषणाई करून तर कुणी आपल्या मोटारीवर झेंडा अथवा त्याचे स्टीकर लावून मिरवतांना दिसून येत आहे. अगदी लहानग्यांपासून तर अबाल वृद्धांच्या तोंडी सध्या अमृत महोत्सवाची चर्चा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त भारतवासीयांसाठी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा आपल्या एका भाषणातून केली. त्यांनी देशवासियांमध्ये एकात्मतेची भावना जागृत राहावी, नेहमी देशाबद्दल आणि स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांबद्दल आदर आपल्या मनात कायम असावा या हेतूने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेला त्यांनी यंदा सुरुवात केली आहे.
त्या अनुषंगाने शहरात नवीन बस स्थानकासमोर असणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात भव्य असा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
त्याचा बरोबर ठिकठिकाणी स्थानिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, कार्यालये, राजकीय पक्ष, नेतेमंडळीही आपल्या स्तरावर उपक्रम राबवितांना दिसत आहेत. नागरिकही त्यात तितक्याच उत्साहाने सहभागी होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. एकीकडे हे सकारात्मक चित्र असून दुसरीकडे मात्र शहरात अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज विक्रीसाठी अनेक छोट्या विक्रेत्यांनी ठेवल्याचे दिसत आहे. पण काही ठिकाणी मात्र, खरेदी करतांना लोक ध्वजाला इतर कापड दुकानाप्रमाणे हात लावून तपासतांना त्याला हाताळणी करतांना दिसत आहेत. पाहून झाले की, त्याला विक्रेत्याकडे व्यवस्थित न देता आपल्याला कपडे पसंत नसले कि ज्या पद्धतीने आपण समोर असलेल्या टेबलावर ठेवून देतो, तसेच ढिगाने रचून ठेवलेल्या राष्ट्रध्वजाची ही अवस्था आणि न बघवणारे चित्र सुद्धा शहरात दिसत आहे. यासाठी प्रशासनाने विक्रेत्यांना काही सूचना अथवा नियमावली देणे गरजेचे होते…! विशेष म्हणजे काही विक्रेत्यांनी शहरातील एका पोलीस स्टेशनच्या परिसरातच ध्वज विक्रीसाठी छोटेखानी दुकानं थाटली असून हा असला प्रकार तेथे घडत आहे. जरी ध्वज विक्री करून काही लोक आपला उदरनिर्वाह करीत असतील, तरी त्यांनीही राष्ट्रध्वजाचा आदर आणि त्याची प्रतिष्ठा राखणं देखील तितकचं गरजेचे आहे.
या प्रकरणी प्रशासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, किंवा त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खात्री करून काहीतरी उपाययोजना कराव्यात जेणेकरून आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला गालबोट लागणार नाही.
■घरगुती झेंडावंदन करतांना घ्यावयाची काळजी■
घरगुती झेंडा घरी नेमका कुठ लावला पाहिजे ? ज्या ठिकाणी ध्वज लावल्याने त्याची शोभा वाढेल. जिथून झेंडा दिसून येईल अश्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न नागरिकांचा असावा. खादी किंवा पॉलिस्टरचा कापड नागरिकांनी वापरावा. प्लास्टिकचा, कागदी तिरंगा वापरू नये. आकार सर्वसाधारण ३ बाय २ असावा… ३ आडवा, २ उभा असावा, केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनिच्या बाजूने राहील या प्रमाणे फडकवावा. ध्वज उतरवितांना सावधानतेने व सन्मानाने उतरवावा, कोणत्याही पद्धतीने ध्वज फाटणार नाही किंवा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वज उतरविल्यानंतर व्यवस्थित व सुरक्षित ठेवावा, ध्वजाला कोणतीही सजावटीची वस्तू लावू नये. तसेच राष्ट्रध्वज फडकविते वेळी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास मनाई आहे. ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर अथवा चिन्ह काढू नये. राष्ट्रध्वज चुरगळलेला, मळलेला अथवा फाटलेला लावू नये. तोरण, गुच्छे अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये.