अवकाळीचे उत्तर महाराष्ट्रात 12 बळी !

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू : जळगावातील एकाचा समावेश

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेले दहा दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे धुमशान सुरू होते. या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू वीज पडून झाल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. मृतांच्या वारसांना सरकारी मदत मिळवून देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. 12 पैकी सर्वाधिक पाच बळी नाशिक जिल्ह्यात झाले आहेत.

नाशिक महसूल विभागात नाशिकसह, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. मागील दीड आठवडा विभागात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. नाशिकसह अहिल्यानगरमधील द्राक्षे, डाळिंबाच्या बागांचे आणि जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. पिकांच्या हानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेच आहे परंतु, त्याचबरोबर काही नागरिकांचा जीव गेल्याने ती कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

पाच जिल्ह्यांत एकूण 12 जणांनी या पावसामुळे जीव गमावला आहे. ज्यापैकी सात जणांचा मृत्यू वीज अंगावर पडून झाला आहे. झाड अंगावर पडणे, घराचे छत अंगावर पडणे, पावसामुळे विद्युत तारेचा शॉक लागणे अशा कारणांमुळे काही जणांचा मृत्यू झाला. नाशिक आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी दोन जणांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. विभागात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त अहिल्यानगरमध्ये तीन, नंदुरबारला दोन, तर जळगाव व धुळ्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. याशिवाय काही व्यक्ती जखमी देखील झाल्या आहेत. वीज पडून शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली असून, घरांबरोबर गोठे, पोल्ट्री व तत्सम मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. मृतांच्या वारसांना मदत देता यावी याकरीता महसूल विभागाने नियमानुसार कार्यवाही सुरू केली आहे. नाशिकमध्ये मे महिन्यापर्यंत 103.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 7 मे पासून 98.3 मिमी अवकाळी पाऊस पडला आहे. 10 मे रोजी सर्वाधिक 33.8 मि.मी अवकाळी पाऊस नोंदविला गेला. एप्रिलमध्ये 5 मिमी पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 103.3 मिमी पावसाची नोंद झाली.

 

यांचा झाला मृत्यू

नाशिक- पूजा भांगरे (इगतपुरी) विकास बर्डे, रामदास सहाणे (सिन्नर), सम्यक भोसले व गौरव रिपोर्ट (नाशिक शहर), अहिल्यानगर- गणेश काळे (नेवासा), शिवाजी वाघचौरे (अकोले), आरती लहारे (कर्जत), नंदुरबार- रमेश पवार व तुषार वळवी (शहादा), धुळे- रवींद्र देवरे (दोंडाईचा), जळगाव- शरद भिल (एरंडोल)

 

जिल्हानिहाय झालेले मृत्यू

नाशिक — 05

अहिल्यानगर — 03

नंदुरबार — 02

धुळे — 01

जळगाव — 01

 

Leave A Reply

Your email address will not be published.