जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भटकंती करणार्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक…
स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :
विशाल जोशी, वाकोद ता जामनेर
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अमृत महोत्सव म्हणून ‘हर घर तिरंगा’ या अभियानातून प्रत्येक घरावर १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. परंतु भटक्या विमुक्त जाती जमातीतील गोरगरीब, वंचित घटक व भटकंती करणाऱ्या समाजाला राहायला घरच नाही. अशा अवस्थेत या समाजबांधवांनी कुठे ध्वजवंदन करायचे, हा प्रश्न आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा कालखंड होत असून, आजही गावो गावी नंदीबैल, वासुदेवाची वेशभुषा करून भटकंती करणारा भिक्षा मागणारा जोशी समाज असेल किंवा फासेपारधी, कुडमुडे जोशी, कातकरी, लोहार, गोसावी किंवा वंचित घटकातील समाज बांधव विकासापासून वंचित आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून व राजकीय नेतेमंडळींनी जोशी समाजाला किंवा अन्य जातींना अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम केले आहे.
महाराष्ट राज्यासह संपुर्ण भारतात भटकंती करणारा हा समाज, यातील अनेकांना आज सुध्दा हक्काची घरे नाहीत, जागा नाही, रेशनकार्ड नाही हे नसल्याने समाजातील मुलं मुली आजही शिक्षणापासून वंचित राहत आहे.
या समाजबांधवांना खऱ्यार्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे का…? हा प्रश्न आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राजकीय नेते व प्रशासनाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर सुध्दा या समाजाची व्यथा मात्र समजलेली दिसत नाही. गावो गावी पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणाऱ्या समाजाला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार या वंचित घटकातील समाज बांधवांना न्याय देतील कधी ? हे मात्र सांगता येत नाही.