
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावातील दंगलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात रविवारी सामाजिक ऐक्य, राजकीय समावेशकता आणि विकासाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात वृक्षरोपण, वाचनालय उद्घाटन आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी वसीम खान यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते वसीम खान यांना नियुक्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ज्या परिसरात झाला तो परिसर पूर्वी दंगलग्रस्त म्हणून चर्चेत होता. मात्र आता त्याच भागातून शांतता, शिक्षण आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमात बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी मोठी घोषणा करत दंगलग्रस्त कॉलनीला आता अब्दुल कलाम नगर म्हणून ओळख दिली जाईल, असे सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन या भागात शिक्षण, विकास आणि सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
भाजप हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. देशाच्या विकासात प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. या घोषणेनंतर उपस्थित मुस्लिम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. अनेकांनी जल्लोष करत भाजपच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. कार्यक्रमादरम्यान अनेक मुस्लिम युवकांनी आणि नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात या कार्यक्रमाची चर्चा रंगू लागली आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर वसीम खान यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप सातत्याने काम करत आहे. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत समाजहितासाठी अधिक वेगाने काम करू असे सांगितले.
या उपक्रमामुळे जळगावात भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सामाजिक सलोखा आणि विकासाच्या मुद्द्यावर अधिक सक्रिय होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक एकता या तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून झालेल्या या कार्यक्रमाने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

