
सुरेश पाटील
किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रमुख व सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून किनगावची ओळख आहे. परिसरातील सुमारे २२ ते २७ गावांसाठी किनगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून, दैनंदिन प्रवासासाठी हजारो नागरिक या ठिकाणावर अवलंबून आहेत. लांब पल्ल्याच्या बसगाड्यांना येथे थांबा असल्याने किनगावचे महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी अद्याप अधिकृत बसस्थानक नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
किनगावहून जळगाव, चोपडा, धानोरा व यावल येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणारे कर्मचारी आणि व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणावर बससेवेचा वापर करतात. तरीही बसस्थानकाचा अभाव असल्याने प्रवाशांना उन्हात, पावसात किंवा थंडीत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा दुकानांच्या आडोश्याला थांबण्याशिवाय पर्याय राहत नाही. बसस्थानक नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत असून, बस थांबण्याची ठराविक व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय वाढते. विशेषतः वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे.
किनगावसारख्या महत्त्वाच्या केंद्रस्थानी बसस्थानक, शौचालय व इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच बससेवेचे नियोजन सुधारावे, अशी मागणी किनगाव व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. यासाठी यावल आगार प्रमुख व लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. किनगाव येथे बसस्थानक नसतानाच महिला व पुरुषांसाठी शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेषतः महिलांसाठी ही समस्या अधिक गंभीर असून, दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्यास अडचणी वाढतात.
यावल बसस्थानक ‘नॉट रिचेबल’
बसच्या वेळापत्रकाबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रवासी यावल बसस्थानकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र दूरध्वनी क्रमांक सतत ‘नॉट रिचेबल’ किंवा व्यस्त येत असल्याची तक्रार आहे. अनेकदा आगार प्रमुखांकडे याबाबत तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अचूक माहिती मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
अनियोजित बसफेऱ्यांनी विद्यार्थी त्रस्त
किनगावहून शिक्षणासाठी धानोरा, चोपडा व जळगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वेळेत बसफेरीची कमतरता भासत आहे. यावल-वापी आणि यावल-धुळे या बसगाड्या एकाच वेळेस येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. या गाड्यांमध्ये वेळेचे अंतर ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच चोपड्याहून किनगावकडे सायंकाळी ६:४५ नंतर बसफेरी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास बसस्थानकावर थांबावे लागते. रात्री ८ वाजता चोपडा-रावेर बसनेच परतावे लागते. त्यामुळे सायंकाळी ६:३० ते ७ दरम्यान यावलमार्गे किनगावकडे जाणारी नवीन बसफेरी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

