नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आधारकार्ड, पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र अत्यंत महत्वाची कागदपत्रे मानली जातात. पॅनकार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधारकार्डशी लिंक करावे लागणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने कार्यवाही अधिक वेगाने सुरू केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह विभाग आणि यूआयडीएआय अधिकारी महत्वाची बैठक पार पडली. मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्यास या बैठकीत निवडणूक आयोगाने मंजुरी दिली.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदन दिले. यात म्हटले आहे की भारतीय संविधानातील अनुच्छेद 326 आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमचे कलम 23(4), 23(5) आणि 23(6) नुसार ईपीआयस आधारकार्डशी जोडण्यात येणार आहे. याआधी केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक आयु्क्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृहसचिव, एमईआयटीवायचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाचे तज्ज्ञ या बैठकीस उपस्थित होते.
पुढील तीन महिन्यात डुप्लिकेट नंबर असणारे व्होटर आयडीला नवीन EPIC नंबर जारी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने नुकताच घेतला होता. डु्प्लिकेट नंबर असणे म्हणजे याचा अर्थ बनावट मतदार आहे असा होत नाही असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. आधारकार्ड मतदार ओळखपत्राशी जोडण्यामागे मुख्य उद्देश मतदार याद्यांतील गडबडी दूर करण्याचा होता. या निर्णयामुळे बनावट मतदार ओळखण्यास मदत होईल असे निवडणूक अधिकाऱ्यांना वाटते.
सन 2021 मध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मध्ये संशोधनानंतर आधारकार्डला व्होटर आयडी कार्डबरोबर लिंक करण्यास मंजुरी मिळाली होती. यानंतर 2022 मध्ये निवडणूक आयोगाने ऐच्छिक आधारावर मतदारांकडून आधार नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु आयोगाने मतदार याद्यांच्या आपल्या संशोधनात आधार संख्येचा वापर अजून तरी केलेला नाही. मतदार याद्यांत मतदारांच्या बनावट नोंदी शोधून काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचा निर्णय बंधनकारक केलेला नाही.
पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांत मतदारांचे एकसारखेच ईपीआयसी नंबर असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. कोलकाता शहरात पक्षाच्या एका संमेलनात मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाशी संधान साधून भाजपने मतदार याद्यांत हेरफेर केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता.