पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप सुरुच आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “अग्रवाल कुटुंबीयांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अग्रवाल यांनी जे वकिल दिले आहेत, ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत”, असा आरोपी नितेश राणेंनी केला होता. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारले असता, त्यांनी पत्रकारांसह आरोप करणाऱ्या सर्वांना उदाहरणे देऊन झाप झाप झापले आहे.
मला सांगा, आज देशात प्रख्यात वकिल हरिश साळवे आहेत. एवढं तुम्हाला माहिती तर आहे. उद्या तुम्ही हरिश साळवेंना एखादी केस दिली. त्यानंतर दुसरीकडे काही केस झाली आणि हरिश साळवे तिकडे गेले. तर मग हरिश साळवेंवरुन आरोप करणार का ? वकिल कोणाचीही केस घेऊ शकतो. मला पत्रकार मित्रांना हात जोडून विनंती करायची आहे. ओळखीचा वकिल कोण देत बसत नाही. कारण नसताना तुम्ही चौकशी तिसरीकडेच घेऊन जात आहात. वकिल कोण दिला, त्या वकिलाला जाऊन विचाराना. त्याला विचारा तुला कोणी नेमला? तुला कोणी केस लढवायला दिली, असे सगळे विचारा. काहीही चाललय, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात एक हिट अँड रनचे प्रकरण घडलय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याबाबत कुठेही भाष्य करताना दिसत नाहीत. शिवाय, आरोपीच्या वकिलांशी तुमचे संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारले पाहिजे. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. आता तुम्ही एखाद्या वकिलांचा संबंध तुम्ही याच्याशी जोडणार आहात. कोणीतरी चार ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे, असे मला वाटते नाही. आता या प्रकरणाला वेगळे स्वरुप देण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी मीच भाष्य केले पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबतची जबाबदारी पाळली आहे.