वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्रातून विल्हाळे बंडावर पाण्याद्वारे राख वाहून नेणाऱ्या पाईप लाईनवरील सुरक्षा रक्षकांना अचानक कामावरून काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात लोक संघर्ष समितीने बेमुदत उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.
तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्रातून पाईप लाईनद्वारे विल्हाळे बंडावर राख वाहून नेली जाते. सदर पाईप लाईन फुटतुट झाल्यास तीचा संदेश तात्काळ विज केंद्रात पोहचविण्यासाठी ४५ सुरक्षा रक्षकांची नेमणून केली होती. मात्र या सुरक्षा रक्षकांना कोणतीही पुर्व सुचना न देता अचानक त्यांना कामावरून काढून टाकले.
याचा जाब विचारण्यासाठी सुरक्षा रक्षक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांना उडवा उडवीचे उत्तर दिले. याच्या विरोधात लोक संघर्ष मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश कुरकुरे यांच्या नेतृत्वात विल्हाळे बंडावरच बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेत आंदोलन सुरु केले आहे. जर आम्हास दोन ते तीन दिवसात न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.