विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मू.जे.तील ऐश्वर्याने मारली बाजी
जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल विचार पीठे कमी होत चालली आहेत. तरुणांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. जो विचार वक्तृत्व स्पर्धांमधून मांडला जाईल त्याचे त्या स्पर्धकांनी कृतीत रुपांतर करावे. चांगला वक्ता हजारांमधून एकच निपजतो. त्याच्याजवळ अभ्यास, आचार, विचार आणि अभिव्यक्ती कौशल्याची शिदोरी असावी. विचार प्रवण आणि कृतीशील तरुण पिढीला योग्य अशी व्यासपीठे लाभली पाहिजेत. विद्यार्थी जीवनात अभ्यासाचे सातत्य आणि विचार मांडणीचे कौशल्ये जोपासली पाहिजेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने सदर स्पर्धेद्वारे चांगला पुढाकार घेतला आणि सेवा पंधरवाड्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी मूळजी जेठा महाविद्यालयाला दिली.” असे प्रतिपादन शिक्षणशास्त्र महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.अशोक राणे सरांनी मू.जे.महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी आणि हिंदी विभाग, मू.जे.महाविद्यालय, जळगाव आयोजित विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांनी केले. राज्यगीताने या स्पर्धेचा आरंभ करण्यात आला.स्पर्धेचे प्रास्ताविक संयोजक डॉ.विजय लोहार यांनी केले.
समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ.अशोक राणे अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थी दशेत केलेल्या अशा स्पर्धा आपल्या भावी करियर साठी किती महत्वाचे आहे यावर आपले विचार प्रकट केले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांनीही विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला कशी आत्मसात करावी, याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की वक्तृत्त्व कला आत्मसात करण्यासाठी आपले चौफेर वाचन असले पाहिजे. आपल्यात सभाधैर्य येण्यासाठी आपण अधिकाधिक सराव केला पाहिजे. आपल्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे. मंचावर आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.साहेबराव भूकन उपस्थित होते.

परीक्षक म्हणून महाराष्ट्र युवा वक्ता पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध कवी, पत्रकार श्री. मयूर भावे, पुणे आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई, मुंबई येथील हिंदीचे विद्वान डॉ.रामदास तोंडे यांनी सदर स्पर्धेच्या परीक्षणाचे दायित्व सांभाळले. या स्पर्धेत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे एकूण ६० स्पर्धक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले तर आभार सह-संयोजक डॉ.मनोज महाजन यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा.कमलाकर रूगे, प्रा. अंकिता दुबे, प्रा.विनोद अहिरे, प्रा.विशाल पाटील, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.प्रज्ञा दुग्गड, प्रा.ज्योती लेकुळे, प्रा. रंजित आडे, अतुल तेली, उज्वला पाटील आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक- कु.ऐश्वर्या प्रल्हाद पाटील. मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव, रु.१० हजार व करंडक
द्वितीय क्रमांक:- कविता रामचंद्र माळी, दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील महाविद्यालय, चोपडा, रु.०७ हजार व करंडक
तृतीय क्रमांक :- शेख अल्बिया अहमद, एच.जे.थीम महाविद्यालय, जळगाव रु.०५ हजार व करंडक
उत्तेजनार्थ : ख़ुशी राजा ललवाणी, आय.एम.आर.कॉलेज, जळगाव (हिंदी माध्यम )
उत्तेजनार्थ : चंचल संगीता सुनील धांडे, (मराठी माध्यम)
उत्तेजनार्थ : सना हामिद शहा, एच.जे.थीम महाविद्यालय, जळगाव (इंग्रजी माध्यम)


