
लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय शत्रुत्व निर्माण झालं आहे. दोन्ही नेते राजकीय मंचावरून एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसतात. विधानसभा निवडणुकीतही दोन्ही गटाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र, शिवसेनेत फूट पडली असली तरी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात, असा खळबळजनक आरोप शेतकरी नेत्याने केला आहे. शेतकरी नेत्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर हे वाशिम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रविकांत तुपकर यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांच्या मुद्यावर भाष्य केलं. यावेळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर महत्वाचं विधान केलं.
‘वेगवेगळ्या पक्षाचे आमदार मुंबईत एका ताटात काला करून खातात. मी जवळून पाहिले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे किती भांडतात, पण दिल्लीत एका ताटात खातात, असा खळबळजनक आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी वाशिम येथून केलाय. वाशिम येथे उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.
वाशिमच्या आडोळी येथे शेतकऱ्यांची विना अट सरसकट कर्जमाफी करावी या मागणीला घेऊन गावातील शेतकऱ्यांनी ‘गाव विक्रीला काढलं होतं आणि ठिय्या आंदोलनही सुरू केलं होतं. ठिय्या आंदोलन सलग ११ दिवस चालल्यानंतरही प्रशासनानं याची दाखल न घेतल्याने शेतकरी सतीश इढोळे यांनी ११ एप्रिल रोजीपासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज शुक्रवारी आंदोलनाला भेट देऊन आमरण उपोषण सोडवलं. त्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान खळबळजनक आरोप केले.

