बिडगाव येथील घटना : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

धानोरा, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या बिडगाव- कुंड्यापाणी ग्ामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुंड्यापाणी (पेसा क्षेत्र) येथील आदिवासी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ न मिळाल्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. यासंदर्भात रेवतसिंग गेवरसिंग पावरा, तुकाराम भावसिंग पावरा या दोन लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे सविस्तर तक्रार नोंदवली आहे. आज सकाळी आदिवासींनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घातला.
लाभार्थ्यांच्या निवेदनानुसार, त्यांनी 2024 पासून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करून आवश्यक सर्व कागदपत्रे त्यात 8 नंबर उतारा व इतर आवश्यक पुरावे संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात सादर केले आहेत. मात्र, इतका कालावधी लोटूनही त्यांच्या अर्जावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. याउलट, वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रतिनिधींनी त्यांना योजनेंतर्गत लाभापासून वंचित ठेवले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात लाभार्थ्यांनी सांगितले की, आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील असून रोजंदारी मजुरी, उसतोड कामगार म्हणून बाहेरगावी जाऊन उदरनिर्वाह करतो. आमच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसतानाही, पात्र असतानाही आम्हाला घरकुलाचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. तसेच, त्यांनी दि. 30 मार्च 2026 रोजी ग्रामसेवकांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला होता. परंतु, त्या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, त्यांना घरकुल नाकारण्यामागील कारणांचा खुलासा करण्यात यावा आणि तात्काळ घरकुलाचा लाभ मंजूर करावा, येत्या 8 दिवसांत घरकुलाचा पहिला हप्ता मंजूर झाला नाही, तर आम्ही ग्रामपंचायत पटांगणात धरणे आंदोलन करू. दरम्यान, या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे पेसा क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांच्या हक्कांबाबत प्रश्न निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

