
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दिनांक १३ मे रोजी पारडी गावात “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी महिला, पुरुष तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक संस्कृती, निसर्गपूजन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात समाजजागृतीचा प्रभावी सूर उमटला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री डी. एस. कन्नाके यांनी आदिवासी संस्कृतीचा संदर्भ देत जल, जंगल आणि जमीन या आदिवासींच्या मूलभूत अधिकारांवर सखोल भाष्य केले. “या देशातील मूळ निवासी आदिवासी समाज हा खरा मालक असूनही आज तो उपेक्षित आणि वंचित जीवन जगताना दिसत आहे, ” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, “आजच्या कलियुगात समाजव्यवस्थेतील दोष अधिक ठळकपणे समोर येत आहेत. विज्ञान आणि विकासाच्या युगातही आदिवासी बांधव जंगलात, डोंगर-दऱ्यांत संघर्षमय जीवन जगत आहेत. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे प्रामाणिकपणे लक्ष दिले जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे.” समाजातील वाढती स्वार्थी वृत्ती, मतभेद, अहंकार आणि व्यक्तिकेंद्री मानसिकतेमुळे समाज व देशाचा सर्वांगीण विकास खुंटल्याचेही त्यांनी नमूद केले. “माणूस हा समाजशील प्राणी असूनही आज माणूसच माणसापासून दूर जात आहे, ” असे सांगत त्यांनी सामाजिक ऐक्याची गरज अधोरेखित केली.
आदिवासी धर्म हा निसर्गधर्म असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “निसर्ग हाच आमचा देव आहे. शेवटी प्रत्येकाला पंचतत्त्वात विलीन व्हायचे आहे. त्यामुळे मानवाने निसर्गाशी नाळ जोडून समाजहिताचे कार्य करणे आवश्यक आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी “आदिवासी सल्ला शक्ती” ही चळवळ समाजाला प्रेरणा देऊन एकात्मता, संस्कृती आणि हक्कांच्या लढ्याला बळ देईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थितांनी “जयसेवा… जय निसर्गपूजक… आदिवासी जिंदाबाद!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

