लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातील शिवणी बुद्रुकमधून एका शेतकऱ्याची हृदय पिळवटून टाकणारी करुण कहाणी समोर आली आहे. आधी अस्मानी संकट, नंतर सुलतानी हे दुहेरी संकट बळीराजावर कोसळले आहे. अशातच शिवणी बुद्रुकमधील एक शेतकरी दाम्पत्य शेतीत स्वत:चाच राबताना दिसते आहे. 75 वर्षाचे वैजनाथ सूर्यवंशी मागच्या 8 वर्षापासून बैल नसल्याने स्वतःच शेतीतील अंतर मशागतीचे काम करत आहेत. दोन्ही वृद्ध दांपत्य शेतात सध्या कोळपणीच काम करत आहे.
गेल्या 8 वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले, मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे दोन लाख रुपयाचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यावर आहे. घरची परिस्थिती हालाखीची आणि यात शेती करायची कशी, या प्रश्नाने घेरावलेल्या 75 वर्षाच्या वैजनाथ सूर्यवंशी यांनी बैलाच्या जागी स्वतःला झुंपत कोळपणीचा जू हातात घेतला. वैजनाथ यांच्या कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा दुकानात नोकरी करतो. शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातूनच दोन्ही मुलींचे विवाह उरकले. मात्र या खर्चानंतर बैलजोडी घेण्यासाठी पैसा शिल्लक राहिलाच नाही. कर्जाचा डोंगर मात्र वाढत गेला. सध्या त्यांच्या नावावर दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. एवढे असताना दाम्पत्याने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. पती स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन एकरभर रान ओढतो, तर पत्नी त्याच्या मागे चालत साथ देते.
हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी येते. वयाच्या पंचाहत्तरीनंतर देखील एवढ्या आत्मविश्वासाने शेती करणारे हे दाम्पत्य बळीराजाची जिद्द जिवंत ठेवत आहे. गेल्या 10 वर्षांत अनेक हंगाम गेले. काही वर्षे दुष्काळ, काही वेळा वादळ, तर कधी कष्टाने जगवलेल्या मालाचे भाव कमी. पण त्यांनी जू खांद्यावरून कधी खाली ठेवलेले नाही. हाच त्यांचा संघर्ष आहे आणि हाच त्यांच्या कष्टाचा स्तुत्य परिचय आहे.

कर्जमाफीची मागणी
बळीराजाच्या खांद्यावरच शेतीची उभारी असते, पण त्याच खांद्यावर जर कोळपणीचे जू असावे लागले, तर हा समाज किती मागे आहे याचे दर्शन घडते. शासनाने तातडीने या दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे यावे आणि राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

