भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
येथील कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्र परीसरात एक विवाहित महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले. पोलीस आपला पुढील तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव रस्त्यावरील मयुरेश मार्बलच्या मागील रहिवाशी असलेली विवाहीता काल दुपारी दोनच्या सुमारास चाळीसगाव रस्त्या लगत असलेल्या कॉलनी भागात राहणाऱ्या भावाकडे जाऊन येते असे सांगून घरातुन गेली. त्यानंतर पाच ते पाऊणेसहा वाजेच्या दरम्यान सदर महिला कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्राच्या मागील बाजूस जळालेल्या अवस्थेत आढळून आली.
कॉलनी भागालगत असलेल्या एका शेतकऱ्याचे या महिलेकडे लक्ष गेले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी निरोप देण्यात आला. ते तेथे पोहोचल्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र तेथून जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. सदरची महिला 50-70 टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे. सदर महीलेचा जबाब घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू होते.