लोकशाही संपादकीय लेख
अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ अशोक खरात उर्फ कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाने महाराष्ट्राला लाजवेल असे कांड केले आहे. 2022 मध्ये अशोक खरात हा उदयास आला. सिन्नर येथे शिवनिका संस्थानच्या माध्यमातून स्वतःला दैवी शक्ती असल्याचे भासवून लोकांचे भविष्य सांगण्याच्या हेतूने तो लोकांजवळ जायचा. त्या भोंदू बाबा अशोक खरातला 17 मार्च 2026 रोजी रात्री बारा वाजता अटक करण्यात आली. नाशिक येथे एक 35 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिल्यावरून त्याला अटक करण्यात आली. पीडित महिलेचा कालावधी तीन ते चार वर्षापासूनचा आहे. हा भोंदू बाबा प्रकाशात आला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या शिवनिका आश्रमाला भेट दिली तेव्हापासून. मुख्यमंत्र्यांचे भविष्य सांगण्यावरून त्या भोंदू बाबाला प्रकाशात आणले. मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना प्रकाशात आणले. स्वतःच्या शिक्षण खात्याचा धड कारभार त्यांन जमला नाही परंतु भलत्याच भोंदू बाबाच्या नादी लागल्यामुळे शिक्षणाची ‘ऐसी की तैशी’ झाली हे मात्र खरे आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या सध्या हॉट सीटवर आहेत. त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची आरती केली. त्यांच्या पाया पडल्या. इतकेच नव्हे तर काही महिलांची या भोंदू बाबांची ओळख देखील करून दिली. आज अनेक महिला या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. त्याचबरोबर रूपाली चाकणकर यांनी स्वतःची करंगळी कापून दिली आहे, असा आरोप सुप्रिया सुषमा अंधारे यांनी केला असून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी त्या करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एवढे मोठे कांड भोंदू बाबा अशोक खरात याचे चालले आहे. रूपाली चाकणकर या मात्र गप्प आहेत. पक्षीय स्तरावरील त्यांच्या राजीनामाची मागणी होते आहे. त्यांना थोडी जरी मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून आपल्या महिला आयोगाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा पक्षाचा कोणी कार्यकर्ता यात आढळला तर त्याचा राजीनामा घेतला जाईल, असे सूचक उद्गार काढले आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे निघून रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. जळगावत उद्धव ठाकरे गटाच्या महिलांच्या वतीने मनीषा पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला असून त्यांनी रूपाली चाकणकर यांनी उद्या बारा वाजेपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. एकंदरीत भोंदू बाबाने महिलांचे लैंगिक शोषण केल्याने महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याला जबाबदार आहेत. एवढेच नव्हे तर महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर या शिवनिका या संस्थेच्या संचालक पदावर आहेत. म्हणून नैतिक जबाबदारी ओळखून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.
भोंदू बाबा अशोक खरात यांनी अवघ्या काही वर्षाच्या कालावधीत फार मोठे प्रस्थ निर्माण केले. सिन्नरला शिवनिका संस्थान बंगला, नाशिक येथे गोविंदपुर नगरात प्रशस्त असा बंगला, शिर्डी संस्थान येथे 50 कोटी रुपयांचे भूखंड आणि शिर्डी येथे 30 गुंठे जमिनीचा प्रशस्त असा भूखंड रहिवासी भागात घेतला आहे. त्याने नेव्ही मध्ये 22 वर्षाची सर्विस केली असून तो नेव्हीचा कॅप्टन म्हणून निवृत्त झाला म्हणूनच त्याला कॅप्टन अशोक खरात या नावाने संबोधले जाते. तो एकूण तेरा भाषा अस्खलित बोलतो. त्यामुळे कोणत्याही भाषेतील संवादामुळे त्याला संवाद साधणे सोपे व्हायचे. जगातील एकूण दीडशे देशात त्याने भ्रमण केले हे विशेष होय. मोठमोठे बडे राजकीय नेते त्याने वश केले होते. मोठमोठे उद्योगपती त्याच्याकडे यायचे. उच्चशिक्षित वर्ग त्याच्याकडे दावणीला बांधलेला असायचा आणि भविष्य वाणीमध्ये त्याचा हातखंड होता. त्यामुळे जे काही कौटुंबिक प्रश्न असायचे त्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात त्याच्याशी जोडला गेला होता. ज्या महिलांना मूल होत नाही त्या महिला त्याच्या विशेष आवडीच्या असायच्या. त्यात तर त्याचा एकप्रकारे हातखंडच होता. महिलांना मूल होण्यासाठी त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. इतकेच नव्हे तर स्वतःची लघुशंका महिलांना तो पाजायचा इतका तो नराधम आहे. आतापर्यंत तपासात त्याचे जवळून 100 पेक्षा जास्त व्हिडिओ प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात हा सर्व हिडीस प्रकार पाहायला मिळाला आहे. अजून तर तपास बाकी आहे. खरातला सात दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यात अनेक गोष्टी निष्पन्न होतील. या भोंदू बाबाला आमचे राजकीय मंडळी जीआर काढून मदत करत होते. राज्य मंत्रिमंडळातील एकूण सात मंत्र्यांचा अशोक खरातशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे. त्यांची स्पेशल एसआयटी तेजस्विनी सातपुते या आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत…!

