
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत. मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच 18 आणि 19 एप्रिल रोजी पावसाची देखील शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभाग (MID) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढील चार दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून, दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि थेट उन्हात जास्त वेळ न थांबणे, या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उष्माघाताच्या घटनांना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना गुरुवारी 16 एप्रिल रोजी एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असून, तापमान 43 ते 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून देखील वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरूणाचल प्रदेशमध्ये १५, १८, १९ एप्रिल, मेघालयात १७ आणि १८ एप्रिल, नागालँडमध्ये १८ एप्रिलमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर १५ एप्रिल रोजी आसाम आणि मेघालयमध्ये गारपिटीची शक्यता आहे. दक्षिण भारतात १८, १९ एप्रिल रोजी अंतर्गत कर्नाटकात मेघगर्जनेसह पावासाची शक्यता आहे. १७ आणि १८ एप्रिल रोजी आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे. पश्चिम भारतातील १८-२१ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता
उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्रात कडक उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. अनेक राज्यात पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ५० किमी प्रति तासाने वारा वाहण्याची शक्यता आहे. १७-१९ एप्रिलदरम्यान हिमाचल प्रदेश, १७ एप्रिल रोजी उत्तरांखंडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

