लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभेचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या सुरू असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यासोबत आणखी दोन नेत्यांनाही भाजपने राज्यसभेची संधी दिली आहे. या यादीतून भाजपने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतानाच मित्र पक्षांनाही संधी देण्यात आल्याचं दिसून आलं आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना, भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्रातील चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संधी दिली आहे. या निवडीत राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक संतुलन यांचा विशेष विचार केल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात आणि राज्यस्तरीय समित्यांमध्ये सखोल चर्चा झाली. अनेक नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय झाल्यानंतर, या चार नेत्यांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. राज्यातून एकूण सात जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रातील भाजपकडे विधानसभेत १३२ आमदारांचे बळ आहे, ज्यामुळे पक्षाला आरामात तीन ते चार उमेदवार निवडून आणता येऊ शकतात. पक्षाने सुरुवातीला २५ संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती, त्यातील या चार नावांवर सकारात्मक निर्णय झाला.
उमेदवारांच्या नावांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीतील प्रमुख नेत्यांच्या तीन महत्त्वाच्या बैठका झाल्या. या बैठकींमध्ये विविध नावांवर चर्चा झाली आणि नंतर ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह १० राज्यांतील ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी झाली. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे.

