
पाळधी ता. धरणगाव
पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जीपीएस ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कीर्तन सप्ताहात सातव्या दिवशी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (गेवराईकर) यांच्या ओजस्वी, रसाळ आणि विचारप्रवर्तक कीर्तनाने भाविकांना भक्ती, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनातून साकारलेल्या या सप्ताहाला हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभत आहे.

आपल्या कीर्तनात अक्रूर महाराज म्हणाले की, “जीवनात कोणतीही मोठी प्राप्ती त्यागाशिवाय होत नाही. भक्ती म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे, तर संयम, श्रद्धा आणि समर्पणाची साधना आहे. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी शबरी मातेला संपूर्ण आयुष्य प्रतीक्षेत काढावे लागले. तिची निष्ठा आणि भक्ती पाहून अखेर प्रभू स्वतः तिच्या झोपडीपर्यंत आले. त्यामुळे जीवनात श्रद्धा आणि सातत्य असेल तर परमात्म्याची कृपा निश्चित प्राप्त होते.”
पुढे ते म्हणाले की, “धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्याशी निष्ठा ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आपल्या संस्कारांची ताकद टिकली तर समाज सक्षम राहील. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सैनिकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना बाळगली पाहिजे.”

यावेळी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना अक्रूर महाराज म्हणाले की, “हिंदुत्वाचे विचार जनमानसात पोहोचविणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणजे गुलाबरावजी पाटील. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने महाराष्ट्र ढवळून निघतो. सत्ता, पद आणि प्रतिष्ठा लाभूनही त्यांची नाळ आजही मातीत घट्ट जोडलेली आहे. प्रभू श्रीरामांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी लोकसेवा हेच आपले व्रत मानले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांनी केले.

महाराजांनी मंत्री महोदयांच्या दोन्ही सुपुत्रांचा उल्लेख करताना सांगितले की, “प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उभारलेला हा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे. अशा कार्यक्रमांतून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ होत असते. हा सोहळा स्वर्गीय आनंदालाही लाजवेल असा भव्य आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

ह.भ.प. महाराजांची रेकॉर्ड तोड उपस्थिती
विशेष म्हणजे, आजच्या या राज्यस्तरीय कीर्तन सप्ताहात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून तब्बल ३५ कीर्तनकार, प्रवचनकार आणि महाराज मंडळींनी उपस्थिती लावली आहे. एखाद्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एवढ्या मोठ्या संख्येने कीर्तनकार एकत्र येऊन सात दिवस हरिनामाचा जागर घडवून आणण्याची घटना जिल्ह्यात दुर्मीळ मानली जात असून, यामुळे या सप्ताहाची सर्वत्र चर्चा होत आहे.
या सप्ताहात ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, कैलास महाराज पवार, मयूर महाराज तरवाडीकर, यज्ञेश महाराज सुरतकर, विघ्नेश्वर महाराज सावखेडेकर, परमेश्वर महाराज पारधीकर, शशिकांत महाराज, संदीप महाराज, दीपक महाराज थोरात, कल्पेश महाराज पातोंडा, लालाजी महाराज कुकाणे, प्रेम महाराज शास्त्री, अनिल महाराज एरंडोलकर, राहुल महाराज डोंगावकर, गजानन महाराज धरणगावकर, सुजित महाराज बांभोरीकर, कन्हैया महाराज कुवेकर, गोपाल महाराज दापोरीकर, पवन महाराज सारोळेकर, कुणाल महाराज खडकदेवडीकर, प्रेम महाराज जळगावकर, विकास महाराज खळदेकर, हर्षल महाराज पारधीकर, पंकज महाराज शिरसोलीकर, देवेंद्र महाराज पातोंडेकर, मुकेश महाराज एरंडोलकर, सुरेश महाराज (वकील साहेब), मंगलसिंग महाराज जळगावकर तसेच नंदूदादा सांजोरीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

