लोकशाही न्यूज नेटवर्क
मगहाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील एसबीएल कंपनीत सकाळी सकाळी भीषण स्पोट झाला. काटोल तालुक्यातील राऊळगाव शिवारात असलेल्या SBL एनर्जी लिमिटेड या व्यावसायिक स्फोटके बनवणाऱ्या कंपनी स्फोटानी हादरली. या हृदयद्रावक घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यात यावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.
काटोलमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. राऊळगाव शिवारात असलेल्या ‘SBL एनर्जी’ या कमर्शियल स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कंपनीचा परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला. आवाज आजूबाजूच्या गावतही गेला होता. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. पण तोपर्यंत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळची शिफ्ट सुरू झाली. तेव्हा कंपनीत साधारण ३५ कर्मचारी कामावर हजर होते. सकाळी ६ च्या सुमारास अचानक एका युनिटमध्ये स्फोट झाला. या वेळी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या परिसरात त्याचे हादरे बसले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. माजी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि प्रसारमाध्यमांना मृतांच्या आकड्याबाबत माहिती दिली.
या स्फोटात जखमी झालेल्या १८ कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. कंपनीच्या गेटवर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. हा स्फोट नक्की कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा तपास पोलीस आणि संबंधित विभागाचे तज्ज्ञ करत आहेत. स्फोटके बनवणारी कंपनी असल्याने सुरक्षेचे नियम पाळले जात होते का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी दिली. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटलेय. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

