जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

वाचकांच्या विश्वासाची शिदोरी, समाजाशी जुळलेले घट्ट नाते आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा सातत्याने घेतलेला ध्यास यांचा उत्सव गुरुवार दि. 25 जून रोजी लोकशाहीच्या पटांगणावर उत्साहात साजरा झाला. लोकशाहीच्या 72 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘नव्या युगाची नवी दिशा’ या विशेष पुरवणीचे थाटात प्रकाशन करण्यात आला. या सोहळ्याला जिल्ह्याभरातील वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, सामाजिक कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाशी विश्वासाचे नाते जपणारी एक चळवळ आहे, याची प्रचिती गुरुवारी दि. 25 जून रोजी आली. स्नेह, संवाद, शुभेच्छा आणि आठवणींच्या भावविश्वात रंगलेल्या वातावरणात लोकशाहीचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाचे रंग भरत हा सोहळा रंगला.

शहरातील बळीराम पेठ येथील लोकशाही कार्यालय परिसरात सायंकाळपासूनच उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. मंजुळ सूर, आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अनेक वर्षांपासून लोकशाहीशी नाळ जुळलेल्या वाचकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर नव्या पिढीने आधुनिक पत्रकारितेच्या प्रवासाची ओळख करून घेतली. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ‘नव्या युगाची नवी दिशा’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन. बदलत्या काळातील माध्यमांचे स्वरूप, तंत्रज्ञानाची झपाट्याने होत असलेली प्रगती, सामाजिक परिवर्तन, विकासाच्या नव्या शक्यता आणि पत्रकारितेची बदलती जबाबदारी यांचा वेध घेणारी ही पुरवणी मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशित करण्यात आली. प्रकाशनानंतर उपस्थितांनी पुरवणीचे विशेष कौतुक करत ती काळाची गरज अधोरेखित करणारी असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महापौर दीपमाला काळे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवणे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, उपमहापौर मनोज चौधरी, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अरविंद देशमुख, आनंद हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमित भंगाळे, जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष (मीडिया) अनिल जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी लोकशाहीच्या सातत्यपूर्ण आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे कौतुक करत, समाजातील सकारात्मक बदलांना दिशा देणाऱ्या वृत्तपत्रांची गरज आज अधिक असल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या डिजिटल युगातही विश्वासार्हतेचा पाया कायम राखत लोकशाहीने वाचकांशी जपलेले नाते हेच तिचे सर्वात मोठे बळ असल्याचे अनेकांनी नमूद केले. या प्रसंगी वाचकांनी आणि हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार संपादिका शांता वाणी, कमलाकर वाणी, समूह संचालक राजेश यावलकर, संचालिका शुभांगी यावलकर, निलेश वाणी, सल्लागार संपादक धों. ज. गुरव, व्यवस्थापक सुभाष गोळेसर, वरिष्ठ उपसंपादक दीपक कुलकर्णी, जाहिरात व्यवस्थापक विवेक कुलकर्णी यांनी केला. प्रत्येक मान्यवराशी संवाद साधत त्यांनी लोकशाहीच्या वाटचालीत साथ देणाऱ्या वाचकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यशस्वीतेसाठी राहुल पवार, कविता ठाकरे, मुबारक तडवी, अनिकेत पाटील, निखिल मोरे, संजय सुतार, ललित कोळी, मोहन पाटील, प्रसाद जोशी, भूषण परदेशी, तुषार पाटील, संदीप महाले, गलू सपकाळे, सुरेश सानप, चेतन कुलकर्णी, पंकज गवळी, अक्षय कासार, नितीन नेमाडे, गौरव पाटील यांनी परिश्रम घेतले.
72 वर्षांचा इतिहास उलगडणारे प्रदर्शन ठरले केंद्रबिंदू
वर्धापनदिनानिमित्त उभारण्यात आलेले प्रदर्शन उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. 1955 पासून ते 2026 पर्यंतच्या लोकशाहीच्या अंकांचा अनोखा प्रवास या प्रदर्शनातून मांडण्यात आला होता. सात दशकांतील वृत्तपत्राच्या मांडणीतील बदल, मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगती, शीर्षकांची शैली, छायाचित्रांचा वापर आणि बदलत्या काळानुसार झालेली रचना यांचे जिवंत दर्शन या प्रदर्शनातून घडले. जुन्या अंकांसमोर अनेक वाचक भावूक झाले. काहींनी स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या आठवणी या वृत्तपत्राशी जोडल्या, तर तरुण पिढीने जुन्या पत्रकारितेचा वारसा जवळून अनुभवला. खान्देशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय घडामोडींचे सातत्याने केलेले दस्तावेजीकरण पाहून अनेकांनी लोकशाहीच्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले.
डिजिटल स्वाक्षरी फलकाने वेधले लक्ष
या सोहळ्यात पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचीही सांगड घालण्यात आली होती. मान्यवरांसाठी विशेष डिजिटल स्वाक्षरी बोर्ड उभारण्यात आला होता. उपस्थितांनी त्यावर शुभेच्छा संदेश लिहित स्वाक्षऱ्या केल्या. अनेकांनी लोकशाहीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत पत्रकारितेतील विश्वास, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी याच मूल्यांचा वारसा कायम राहावा अशी अपेक्षा नोंदवली. सात दशकांहून अधिक काळ समाजाचे स्पंदन जपणाऱ्या लोकशाहीने नव्या युगातील बदल स्वीकारत मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवला आहे. वाचकांचा वाढता सहभाग, मान्यवरांच्या शुभेच्छा आणि समाजाचा विश्वास हीच पुढील प्रवासाची खरी ऊर्जा असल्याची भावना संपूर्ण कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवत होती.


