लोकशाही न्यूज नेटवर्क

कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सहदेव बेटकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजातील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जातात. ओबीसी समाजामध्ये त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षांतराचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वीच सहदेव बेटकर यांनी ठाकरे सेनेतील जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत ठाकरे गटातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षांतरामुळे कोकणातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष आता सहदेव बेटकर यांच्या अधिकृत भाजप प्रवेशाकडे लागले आहे.


