जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी जळगाव पोलीस नेहमीच तत्पर असतात. याचाच एक प्रत्यय आज शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करून दिला आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. किरण अनिल बाविस्कर (२४), आकाश सुरेश बर्वे (२३) व महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (२१) गेंदालाल मिल, जळगाव अशी हद्दपार करण्यात आलेल्या टोळी सदस्यांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तीन जणांच्या टोळीला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील गेंदालाल मिल भागातील कुविख्यात टोळीविरोधात जळगाव शहर पोलिसात तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी लूट, दरोडा आदी प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात कारवाई केल्यानंतर ते जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करीत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत जळगाव शहर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यावर पोलीस उपअधीक्षकांनी पडताळणी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.