
लोकाध्यात्म विशेष लेख
आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी तिथीनुसार स्वामी स्वरूपानंद यांची जयंती (16 डिसेंबर 2025). आदिनाथांपासून सुरू झालेल्या नाथ संप्रदायातील एक महान अर्धव्यू. परमहंस पदी आरुढ असलेले स्वामी स्वरूपानंद यांची विपुल ग्रंथरचना उपलब्ध आहे. ‘संजीवन गाथा’ ही त्यांची अभंग गाथा आहे. परतत्वाला स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा आहे व त्यातून अभंग रचना सुरेख निर्माण झालेली आहे. ती साधी सोपी वाटली तरी आशय धन आहे. मनुष्यमात्राच्या जीवनाला नवे वळण देणारी आहे, चैतन्य देणारी आहे. या जयंतीच्या परम पवित्र व मंगल दिनानिमित्त आपण त्यांच्या एका अभंगाचा अंतर्मुख होऊन आस्वाद घेऊया.
“आवडीने भावे हरि नाम गावे”
“निर्लज्ज नाचावे संकीर्तनी” (1)
“रंगता कीर्तनी लाभते समाधी”
“होते योग-सिद्धी अनायसें”(2)
“नसे तरी नसो वेदांताचे ज्ञान”
“नाम संकीर्तन सोडू नये”(3)
“स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत”
“भेटे मूर्तीमंत परब्रम्ह”(4)
संत एकनाथ महाराजही असेच म्हणतात, “आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी सारी चिंता त्यासी आहे.” स्वामी स्वरूपानंद ही तसेच म्हणत आहेत, “आवडीने भावे हरिनाम घेसी” म्हणजे सर्व संतांचे सांगणे एकच आहे, सप्रेम भावांन नामस्मरण करा. आवड असली की सवड मिळते. शिवाय नाम घ्यायला अमुक एक परिस्थिती लागत नाही. प्रवासात, स्वयंपाक करताना, जेवताना, झोपताना आपण नाम घेऊ शकतो. ते नाम आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत नेते, बोधापर्यंत नेते, साक्षात परब्रम्ह भेटते.
नाम घेताना लाज किंवा भीती बाळगू नये. आता आपण तरुण आहोत म्हातारपणी नाम घेऊ हे बरोबर नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? आपण “हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा” एवढ करायला काय हरकत आहे फक्त भावांन व सप्रेम? त्यासाठी लाज व भीती धरू नये. आपले पद, आपली पदवी, पैसा, प्रतिष्ठा,जात, वय, लिंग हे काहीही नामाच्या आड येत नाही.म्हणून स्वामी म्हणत आहेत, कीर्तनात निःसंकोच नाचावे. या नामात रंगूनच कीर्तन करता करता संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ज्ञानदीप लावला. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्यासोबत नाचत असे. यम, नियम,आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा,समाधी हा अष्टांग योग सर्वसामान्य व्यक्तीला योग्य मार्गदर्शनाखेरीज संभावणार नाही. कीर्तनात रंग भरला की वक्ता व श्रोता दोघेही रामरुप होतात. अनायसे सहज समाधी लागते. कुठेही वनात जाऊन हठयोग करावा लागत नाही. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात,”रंगता कीर्तने लागते समाधी”
“नसे तरी नसो वेदांताचे ज्ञान”
“नाम संकीर्तन सोडू नये”
“स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत”
“भेटे मूर्तीमंत परब्रम्ह”
वेदपाठ शाळेत जाऊन शिक्षण घेतले तर तो विद्वान होईल पंडित, घनपाठी, ब्राह्मण होईल, विद्या वाचस्पती होईल पण ब्रह्म जाणणारा संत होणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणूनच म्हणू शकतात, “वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा इतरांनी व्हावा भारमाथा.” नुसतं पांडित्य हे ओझ होत. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात, “नसो तरी नसो वेदांताचे ज्ञान नाम घेण्याचे सोडू नये.” निष्ठेने, निग्रहाने नाम घेत राहावे. खाताना, पिताना, चालताना, बोलताना, नाना भोग भोगत असताना आत्मसत्ता आठवावी म्हणजे नाम घ्यावे. ध्रुव बाळ, प्रल्हाद बाळ यांच्यासारखे भाव प्रेमासकट निग्रहाने नाम घ्यावे. अंशतः आपणही असा प्रयत्न करावा नाम घेणे म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे तर वेळ सार्थकी लावणे. फक्त नाम व व्यवहार यात फारकत असू नये. एक तास भर नाम व उरलेले तास वेडा वाकडा व्यवहार हे चालणार नाही. ‘विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे’ असे तुकाराम महाराजांचे वचनच आहे.
ज्ञानराज माऊली हरिपाठात म्हणतात, “भावबळे आकळे एरवी नाकळे.” भाव भक्तीचे बळ असेल तरच भगवंत समजतो. परमात्मा सत्ता अनुभवण्यास येते अर्थ समजून आचरण झाले तर मूर्ती मंत परब्रम्ह आपल्याला भेटते हा फार मोठा लाभ आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात, “भावे,आकळे वेदांत भेटी मूर्तीमंत परब्रम्ह.”
आज स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण भावासकट नामस्मरण करायला सुरुवात करूया व रामदास स्वामी म्हणतात तसे,”महा घोर संसार शत्रु जिणावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा.” ही त्याची फलश्रुती व्हावी. संसार जिंकावा व संसारात राहून भगवंत आपलासा करून घ्यावा.
हरी ओम !

कोथरूड, पुणे.
मो. 8412926269

