लोकशाही न्यूज नेटवर्क

लखनऊ पोलीस दलाचे आयपीएस अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या 94 वर्षीय आई इंद्रावती यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. हत्या आणि लूटमारीच्या संशयास्पद प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली आहेत. रविवारी इंद्रावती यांचा मृतदेह घरातून सापडल्यानंतर ताब्यात घेतलेल्या तीन जणांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीनंतर त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले आहे.
इंद्रावती यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, पोस्टमार्टम अहवालातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह सुरक्षित ठेवला असून हृदयाचे हिस्टोपॅथॉलॉजिकल अॅनालिसिस करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
इंद्रावती या घरात एकट्याच राहत होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्या अंगावरील काही दागिने गायब असल्याचे आढळले. विशेष म्हणजे त्यांच्या तोंडात कापड कोंबलेले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच या घटनेत घातपात आणि हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अजूनतरी असा कुठलाही पुरावा हाती लागला नाहीये. पोस्टमार्टम अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.
सोमवारी इंद्रावती यांच्यावर अयोध्येत सरयू नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातून निघालेल्या अंत्ययात्रेत शेकडो ग्रामस्थ, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी ईशा प्रिया, एडीएम, जलालपूर एसडीएम यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही अंत्ययात्रेत सहभागी झाले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन व्यक्तींची तब्बल आठ तास चौकशी केली. चौकशीदरम्यान तिघांनीही वेगवेगळी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, सध्या त्यांना सोडून देण्यात आले आहे. एसपी प्राची सिंह यांनी सांगितले की, पोस्टमार्टममध्ये हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे हत्या झालीच असे नक्की म्हणता येत नाही. मृत्यू झाल्यानंतर काही व्यक्ती घरात शिरल्या आणि दागिने घेऊन पसार झाल्या असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. इंद्रावती यांच्या हातातील अंगठी मात्र तिथेच होती, तर पायतले दागिने खाली पडलेली आढळली. त्यामुळे दागिने नेमके कधी आणि कशा परिस्थितीत गायब झाले, याचाही तपास केला जात आहे.


