नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क;
दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेतले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. निलंबन मागे घेण्यापूर्वी, बिर्ला यांनी विरोधी सदस्यांकडून आश्वासन घेतले की ते सभागृहात फलक आणणार नाहीत. त्यानंतर सभागृहात महागाईवर चर्चा झाली.
दरम्यान, राज्यसभेने, द वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन अँड देअर डिलिव्हरी सिस्टम्स (बेकायदेशीर कृत्यांवर प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०२२ मंजूर केले जे लोकसभेने एप्रिलमध्ये मंजूर केले होते. महागाई, ईडीचा “दुरुपयोग”, अग्निपथ योजना आणि इतर मुद्द्यांवर विरोधी सदस्यांनी केलेल्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर हे घडले.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू न दिल्याबद्दल विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पत्रकारांशी बोलताना जोशी म्हणाले, “आमच्याकडे अनेक विधेयके मंजूर करायची आहेत पण दुर्दैवाने सभागृह तहकूब होत आहे. जर काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्याने सभागृहात आश्वासन दिले की खासदार फलक घेऊन येणार नाहीत, तर आम्ही निलंबन मागे घेण्यास तयार आहोत. दरम्यान, गोयल म्हणाले की, सत्ताधारी पक्ष चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधी पक्ष सभागृह चालू देत नाही. “ते या विषयावर चर्चा करण्यापासून पळत आहेत,” ते म्हणाले.