नागपूर, लोकशाही न्युज नेटवर्क –
‘स्त्री व पुरुषात संमतीने शारीरिक संबंध असल्यास त्याला बलात्कार म्हणता येणार नाही’, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने युवकाला दिलासा दिला. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या या आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
न्या. विनय जोशी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. शुभम दिकोंडवार असे या याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्याची व युवतीची फेसबुकवरून मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी लग्नाचाही निर्णय घेतला. मात्र, काही कारणांस्तव लग्न मोडले. यावर तरुणीने शुभमविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. ती न्यायालयाने चुकीची ठरवित शुभमविरुद्धचा गुन्हा व दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिलेत.याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. राजेश नायक यांनी बाजू मांडली. तसेच, बलात्कार आणि संमतीने शारीरिक संबंध ठेवणे यात बराच फरक असल्याचेही न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. अशा प्रकरणात खोटे बोलून किंवा फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित झालेत का, हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते. जर आरोपीचा उद्दिष्ट फक्त संबंध ठेवणे असेल आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले असेल तर तो बलात्कार समजला जाईल.
मात्र, त्याच्या हेतूमध्ये दोष असल्याचे सिद्ध होत नसल्यास किंवा लग्नाचा शब्द देऊन भविष्यात काही कारणास्तव आरोपीने लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार मानला जाणार नाही. काही प्रकरणांमध्ये स्त्री किंवा तरुणी स्वत: प्रेमातून शारीरिक संबंधांना संमती देते. अशा प्रकरणांना बलात्काराच्या वर्गवारीत समाविष्ट करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने याप्रकरणी नोंदविले आहे.