सुकळी शिवारात मधमाशांचा हल्ला

एकाचा मृत्यू, एक जखमी; परिसरात हळहळ
मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील सुकळी शिवारात फिरायला गेलेल्या तरुणांच्या गटावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवल्याने एकाचा मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावातील सहा ते सात मित्रांचा गट शिवारात गेला होता. शिवारात थोड्या अंतरावर गेले असता अचानक मधमाशांचा प्रचंड कळप त्यांच्या दिशेने झेपावला. या हल्ल्यात रवींद्र राठोड (वय २९) आणि योगेश पाटील (वय ४०) हे दोघे गंभीर जखमी झाले.
तत्काळ त्यांना मुक्ताईनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मधमाशांच्या दंशामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रवींद्र राठोड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसऱ्या जखमी योगेश पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुकळी परिसरात शोककळा पसरली आहे.

