जळगाव :-घरातील सर्व कुटुंबीय खालच्या मजल्यावर असताना वरच्या मजल्यावर जाऊन एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद येथे 21 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शशिकांत रवींद्र माळी (वय १९, रा. नशिराबाद, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सात बाजार भागात शशिकांत माळी हा तरुण आई, वडील व मोठ्या भावासह राहत होता. त्याच्या वडीलांची एमआयडीसी परिसरात कंपनी आहे. तर शशिकांत हा शिक्षण घेत होता.
मंगळवारी त्याच्या घरातील सदस्य खालच्या खोलीत असताना शशिकांत वरच्या मजल्यावर गेला. त्याठिकाणी त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास शशिकांत याचा मोठा भाऊ त्याला बोलविण्यासाठी गेला. त्याने शशिकांत याला आवाज दिला मात्र तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे मोठ्या भावाने दरवाजा उघडताच त्याला शशिकांत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने घरातील सदस्यांना व शेजारील मंडळींना बोलवले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या वेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयताच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ व बहीण असा परिवार आहे.