लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुण विद्यार्थ्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य कुंडलिक चव्हाण असं मृत विद्यार्थ्याचं नाव होते. चैतन्य हा कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या एबीएम, सीओएचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. १४ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर चैतन्य पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरजवळ गेला होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का लागला आणि तो खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. १० दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला.
चैतन्यचा मित्र अक्षय सूर्यवंशीने दिलेल्या माहितीनुसार, वॉटर कुलर नीट थंड होत नसल्याने चैतन्यने त्याची पिन पुन्हा सॉकेटमध्ये लावली. मात्र, नळाला स्पर्श करताच त्याला जोरदार शॉक लागला आणि तो तिथेच चिकटला. मागून मदतीला धावलेल्या मुलालाही काही करता आले नाही. अखेर वीजपुरवठा खंडित केल्यानंतर तो खाली कोसळला. मेसमध्ये चपला घालून जाण्यास सक्त मनाई आहे. अनवाणी पायाने पाणी पिण्यास गेलेल्या चैतन्यला चपला नसल्यामुळे विजेचा धक्का अधिक तीव्रतेने बसला.
१४ मार्चला चैतन्यला मेसमधील वॉटर प्युरिफायरचा शॉक लागला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. चैतन्य हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातला आहे. त्याचे आई-वडील शेतकरी आहे. कृषी महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाचा तो विद्यार्थी होता. चैतन्यच्या मृत्यूनंतर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कॉलेजमधील सर्व उपकरणांचा ऑडिट करण्यात यावं आणि चैतन्यला न्याय मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

