मुंबर्इ : मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतांनाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेली पहिली प्रतिक्रिया भाजपला झटका देणारी आहे. मराठी भाषेच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर भूमिका मांडली आहे. भाषा वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे की, त्या त्या राज्यांनी आपल्या स्थानिक भाषेत शिक्षण घ्यावे, संघाचे नेहमीचे मत आहे की भारतातील सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या राज्यातील स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावे, असे आम्ही नेहमी सांगतो. आपल्या आपल्या राज्यात लोक स्थानिक भाषेत बोलतात, आणि त्यात शिक्षण घेणे हेच योग्य. हे मत संघाने पहिल्यापासून मांडलेले आहे, आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहोत. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाषेवरून वाद निर्माण होतोय, पण आमचे मत स्पष्ट आहे सगळ्या भाषा राष्ट्रीय आहेत आणि स्थानिक भाषेला प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय आता सरकाराने रद्द केले आहेत. हिंदी भाषेबाबतच्या निर्णयाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेने कडाडून विरोध केला होता. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची गरज नाही, महाराष्ट्रात मुलांना मराठीच अनिवार्य केली पाहीजे या मागणीने जोर धरला आणि या मुद्दयावरून दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले.
अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक पार पडली. देशभरातून सर्व प्रांत प्रचारक यात सहभागी झाले होते. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापनेसाठीचे प्रयत्न सुरू असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. देशाच्या सीमावर्ती भागांतून आलेल्या प्रचारकांनी देशाच्या सुरक्षेबाबत आपली मते मांडली. 17 हजार 609 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी 40 वर्षांहून अधिक वयाचे 8 हजार 812 स्वयंसेवक सहभागी झाले होते. 1 लाख 3हजार 19 ठिकाणी सामाजिक सौहार्द बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील 924 जिल्ह्यांमध्ये प्रमुख नागरिकांच्या गोष्टींचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला. सुनील आंबेकर, प्रचारप्रमुख आणि अनिल अग्रवाल, दिल्ली प्रांत प्रचारक मंचावर उपस्थित होते.

भाषेवरुन भांडणे का? : राऊत
संघाने मराठी भाषे संदर्भात भूमिका जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध! मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे! मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

