सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
खरिपासह रब्बीच्या पिकांसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता आणि शेती पंपाच्या वीज पुरवठ्या अभावी सुकलेली रब्बीचे पिकं व केळी बागा या चिंतेमुळे गुरुवारी राहत्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सायंकाळी सहा वाजता या शेतकऱ्याने कर्ज फेडण्याची चिंता व केळी बागासह रब्बीच्या पिकांची वीज पुरवठ्यामूळे झालेली अवस्था पाहून गळफास घेतला आहे.
राजेंद्र भगवान इंगळे(वय ५३) असे या गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे एक हेक्टर शेती आहे. त्यांनी केळी बागासह रब्बीच्या मक्याची लागवड केली आहे. परंतु सध्या शेती वीज पंपाची या भागात मोठी समस्या भेडसावत असून केळीसह रब्बीचे मका पिके सुकत आहे. त्यामुळे शेतीवर काढलेले सोसायटीच्या कर्जासह इतर खासगी कर्ज फेडण्याची चिंता लागून असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
दरम्यान त्यांना पिकांची बिकट स्थिती पाहून कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी( दि. ०७) सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सोयगाव तालुक्यात कर्जाची विवंचनेत जानेवारी महिन्यात दोन आणि फेब्रुवारी महिन्यात एक अशा तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे.