सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याने दिवस उजडताच गुरुवारी सकाळी आठ वाजता एका शेतात झाडाला गळफास घेतल्याची घटना निंबायती शिवारात घडली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामलाल चतरु राठोड (वय ५२) असे गळफास घेऊन जीवन संपविलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर एकत्रित कुटुंबात शेती आहे, मात्र खरिपात उत्पन्न हाती न आल्याने व पिकविम्याची व शासनाची अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या रामलाल राठोड यांनी टोकाचे पाऊल उचलले त्यांच्याकडे खासगी फायनान्स व राष्ट्रीयकृत बँकेच्या एकूण तीन लाख रुपये कर्ज होते.
ते कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेतला. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचं शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा डुकरे, सहायक राहुल दांडगे यांनी करून अंत्यसंस्कारसाठी शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सायंकाळी चार वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.