इंदौर, लोकशाही न्युज नेटवर्क

सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी बेपत्ता झाल्याचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले इंदोर येथील कपल मिसिंग झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशी याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील तिघा जणांना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा देखील सामील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीचे राज कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यानेच हा हत्याकांड रचला होता. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, राज कुशवाहा हा मध्य प्रदेशचाच रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. त्यानेच सोनमसोबत मिळून मध्य प्रदेशातील तीन जणांना राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती. या सर्वांनी मिळून मेघालयमध्ये हनिमून दरम्यान राजा रघुवंशीची हत्या केली. त्यानंतर सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा सोबत पळून गेली. सोनम आणि राज हे दोघे उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोहोचले, जिथे पोलिसांनी त्यांना पकडले.
राजा रघुवंशी आणि सोनम हे दोघे मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी होते. हनिमूनसाठी मेघालयला गेल्यानंतर ते दोघे 23 मे रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर 2 जून रोजी राजाचा मृतदेह चेरापूंजीजवळ सोहरारिम येथील एका दरीत सापडला.
सोनम रघुवंशीला अटक केल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून राज कुशवाहा, तसेच हल्लेखोर विक्की ठाकूर, आनंद आणि आकाश यांना सागर येथून अटक केली. मेघालयच्या डीजीपींनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, “तिघा जणांना अटक करण्यात आली आहे, तर आत्मसमर्पण करणारी महिला राजा रघुवंशीची पत्नी सोनम आहे.”
सोनम पकडली गेल्यानंतर पोलिसांनी तिला उपचारासाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवले. सध्या तिला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. हे सेंटर हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी आश्रयस्थान आहे. सोनम रघुवंशीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, तिचे राज कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. राज कुशवाहा देखील या कटात सामील आहे.
सोनम रघुवंशीच्या अटकेनंतर, राज कुशवाहा आणि तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक जलद गतीने करत आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


