लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणामुळे एका २५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्राने खून झाल्याची घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचे वडील मोतीराम एकनाथ चौरे यांनी कळवण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नरुळ येथील सचिन मोतीराम चौरे, वय २५ याचे मागील आठ वर्षांपासून आठंबे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबीयांना असल्याने दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने मुलीला दि. १४ रोजी मुलीच्या वडिलांनी तिला कन्हेरवाडी येथे सचिनच्या बहिणीच्या घरी पाठवून दिले होते.
दरम्यान,काल मुलीचे चुलत भाऊ योगेश मोहन बागुल वय २३, प्रकाश मोहन बागुल वय २५ राहणार साकोरेपाडा तसेच मुलीचा मेहुणा संदीप पवार वय ३७ राहणार चनकापूर यांनी या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून नियोजन करून कन्हेरवाडी येथे सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पोहोचत सचिनवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात सचिनचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घरातील नातेवाईकांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही संशयित आरोपींना चोप देत पकडून कळवण पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाईकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व आरोपींना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हलवले.
या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेम्भेकर, पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे हे करत आहेत. या घटनेमुळे कन्हेरवाडी व नरूळ तसेच कळवण परिसरात शोककळा पसरली आहे.


