
लोकशाही न्यूज नेटवर्क
एकीकडे ऑपरेशन टायगरच्या बातम्यांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव सेनेचे 8 खासदार फोडण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या दरे गावात आहेत. तिथूनच हे ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विधानाने महायुतीत शिलगली आहे. त्यांच्या वक्तव्याने महायुतीमधील जुन्या जखमांवरील खपली तर दूर झाली नाही ना याची चर्चा आता होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नायक चित्रपटातील अनिल कपूर यांच्याप्रमाणे काम केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आली. या सत्तेत एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे हे नाव देशात फार मोठे आहे. त्यांची प्रचंड मेहनत आणि काम या जोरावर सगळी पदे त्यांच्याकडे चालत येतील याविषयी शंका नाही असे कौतुक आबिटकर यांनी केले. ते धाराशिवमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदे यांचे नाव मोठे आहे, हे विधान त्यांनी केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सत्ता स्थापनेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या गावी होते. त्यावेळी शिवसेनेला सुद्धा अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी झाल्याचा दावा करण्यात येत होता. आजही मुख्यमंत्री दरे गावी आहेत आणि त्याचवेळी प्रकाश आबिटकर यांनी मोठे विधान केले आहे. हा निव्वळ योगायोग असला तरी मुख्यमंत्री पद न मिळाल्याची बोचणी यानिमित्ताने पुढे आल्याचा चिमटा विरोधकांनी काढला आहे.
त्याचवेळी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवतील या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. काम करेल त्याला संधी मिळणार, भाकरी फिरवली जाणार, असे एकनाथ शिंदे म्हणतात, असे आबिटकर यांनी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची विकेट पडलेली असताना आणि काहींची नावं वादात अडकल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

