माझी वसुंधरा पुरस्कारात शेंदुर्णी नगरपंचायत राज्यात द्वितीय

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माझी वसुंधरा अभियान  २ मध्ये शेंदुर्णी नगरपंचायतीचा उत्कृष्ट कामगिरी केल्याने महाराष्ट्रात द्वितीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानात महाराष्ट्रातील नगरपंचायत गटात १६५ नगरपंचायत मधून शेंदुर्णी नगरपंचायतीच्या कार्याची दखल घेत  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान पुरस्कार सोहळा रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित  टाटा थिएटर, मुंबई येथे सोहळा झाला. यासह बक्षीस वितरणही करण्यात आले.

यावेळी शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, ज्येष्ठ समाजसेवक अमृत खलसे, नगरसेवक अलीम तडवी, गणेश किसन पाटील, गणेश किसन जोहरे, प्रफुल पाटील, विजय धुमाळ, माझी वसुंधरा प्रमुख लोकेश साळी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी सुत्रसंचालन केले. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका व महापालिका अशा स्तरावरील निकाल जाहीर झाला. त्यात शेंदुर्णी नगरपंचायतचा राज्यात दुसरा क्रमांक व जळगांव जिल्ह्यातील एकमेव शेंदुर्णी नगरपंचायतला पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्काराची रक्कम रुपये दोन कोटी आहे. मागील वर्षीही शेंदुर्णी नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी केली होती. यावर्षी स्पर्धेचे निकष बदलून झालेल्या स्पर्धेतही शेंदुर्णी नगरपंचायतला राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आपले नाव कोरण्यात यश आले आहे.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने हा पुरस्कार शेंदुर्णी नगरपंचायतला देण्यात आला. नगरपंचायत गेल्या काही महिन्यांमध्ये स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार, पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन व शेंदुर्णी शहरामध्ये केलेले वेगवेगळे बदल यांची दखल घेत या पुरस्कारासाठी शेंदुर्णी नगरपंचायतची निवड करण्यात आली.

नगराध्यक्षा विजयाताई खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष निलेश थोरात सर्व सन्माननीय नगरसेवक, व आरोग्य विभाग व इतर सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने नगरपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नागरिक, पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले-  मुख्याधिकारी साजिद पिंजारी

माझी वसुंधरा अभियानात समस्त शेंदुर्णीकरांनी केलेले सहकार्य, पदाधिकारी व कर्मचारी यांची साथ यामुळेच आपल्या नगरपंचायतीस हा पुरस्कार मिळाल्याचे प्रतिपादन शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दै. लोकशाही सोबत बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.