शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या गावामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास एका भागातील गल्ली परिसरात इंस्टाग्राम या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट टाकल्याच्या कारणावरून दोन समुदायातील लोकांमध्ये मध्ये वाद झाला. यामुळे दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी तेथे धाव घेऊन वातावरण शांत केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, तहसीलदार अरुण शेवाळे आदी तात्काळ शेंदुर्णी येथे धाव घेतली. येथे दोन्ही समुदायातील मान्यवरांची तात्काळ बैठक घेण्यात आली.
या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड, भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम थोरात आदींसह नगरपालिकेच्या पदाधिकार्यांसह दोन्ही समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. पोलीस अधिकार्यांनी याप्रसंगी सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असून यातून संघर्ष टाळण्याचे आवाहन केले. तर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील दिली. दोन्ही समुदायातील लोकांनी संयम पाळण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.