नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतविषयक धोरणाचा निर्णय घेतल्याने आज शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. आज निफ्टी ५० ने नवीन विक्रमी उच्चांक गाठत इतिहास रचला. निफ्टी आज पहिल्यांदाच २१ हजारांवर गेला. आरबीआयने रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. या RBI च्या पतधोरण समितीच्या घोषणेच्या काही सेकंद आधी निफ्टी ५० ने पहिल्यांदाच २१ हजारांवर जात उच्चांक गाठला.
आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर निफ्टी ८७ अंकांनी वाढून २०,९८९ वर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढून ६९,८३३ वर व्यवहार करत आहे. ३० स्टॉक्सच्या सेन्सेक्सनेही आरबीआयच्या पतधोरण घोषणेपूर्वी ६९,८८८ अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, एलटी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स हे शेअर्स वाढले. तर एम अँड एम, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, मारुती हे शेअर्स घसरले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरण समितीने सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय आज शुक्रवारी (दि. ७) आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या हप्त्यावर परिणाम होण्याची शक्यती कमी आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.