लोकशाही संपादकीय लेख

जळगाव शहरालगत असलेल्या परंतु विधानसभेच्या ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या वाघ नगर व सावखेडा परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी पंधरा दिवसातून एकदा पाणी नळाला येते, ते देखील कमी फोर्सने येते. त्यामुळे काही नळांना पाणी येते व काही भागात पाणीच येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे. गेल्या आठ जून रोजी देखील सर्व मंडळींनी पाण्यासाठी इशारा दिला होता की, आम्हाला नियमित पाणी नाही दिले तर आम्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू. सुदैवाने वाघ नगर परिसर हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात मोडत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मतदार संघात पाणीटंचाईची अवस्था असल्याने वाघ नगर परिसरात जनता त्रस्त झाली आहे. आज सुमारे 200 महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. आम्हाला नियमित पाणी द्या, अन्यथा खुर्ची रिकामी करा.. असे वाघनगर रहिवासी महिलांचे म्हणणे होते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील सामील झाली आणि मोर्चेकरी महिलांना बहुजन आघाडीची साथ मिळाली. बहुजन आघाडीचे म्हणणे आहे की, वाघ नगर परिसरात पाणी मिळत नाही त्याला कारणीभूत हे पाण्याचे अयोग्य नियोजन होय. पाईपलाईन नेहमी फुटते. पाण्याची पाईपलाईन जी टाकली आहे ती जमिनीच्या अत्यंत वर टाकली असल्याने ती सातत्याने फुटते आणि पाणी घरापर्यंत पोहोचण्याऐवजी रस्त्यातच वाहत जाते. यात शहर आणि ग्रामीण असा वाद असून जळगाव शहर महानगरपालिका म्हणते की ग्रामपंचायत पाणीपुरवठा करेल आणि ग्रामपंचायत म्हणते की जळगाव शहर महानगरपालिकेने पाणी द्यायला हवे. या दोन्हींच्या वादात बिचारे वाघानगर व सावखेडा परिसरातील जनतेचे मात्र हाल होत आहेत. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात हा परिसर येत असल्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची जबाबदारी येथे महत्त्वाची आहे. मात्र पाणीपुरवठा मंत्री फक्त बघायची भूमिका घेत असल्याने वाघनगर वासियांवर हे संकट ओढावले आहे. वाघ नगर परिसरात लोकांनी 50 लाख रुपयांची घरे घेतली आहेत, पण आज अवस्था अशी आहे. की त्यांच्या घरात नळाला पाणीच येत नसल्याने घरात बायका पोरं आणि सर्व मंडळी संडास करण्यासाठी सुद्धा पाणी नसल्याने उघड्यावर जात आहेत, अशी अवस्था आहे. तेव्हा पाण्याअभावी काही होत नाही. पाणी नसेल तर वणवण भटकावे लागते. घरातील महिलांना दिवसभर हेच काम असते की हंडा घेऊन पाणी गोळा करणे. पिण्याला पाणी मिळाले की दोन-चार दिवस अंघोळीला सुट्टी. अशा प्रकारे वाघ नगर परिसरातील जनता आपले दिवस काढत आहेत. त्यामुळे संतप्त महिलांनी आज हंडा मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. त्याला बहुजन समाज आघाडीने साथ दिली. आता हंडा मोर्चा मंत्र्यांच्या घरी न्यायचा नाही, तर अधिवेशन नात विधानसभेवर हंडा मोर्चा नेण्याचे बहुजन समाज आघाडीने ठरवले आहे.
वाघ नगर परिसरातील जनता पाण्यासाठी वैतागले आहे. ग्रामपंचायतकडून होणार नसेल तर जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे त्यांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी त्यांची रास्ता आहे. त्यात पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यातील पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी या भागातील जनतेचे म्हणणे आहे. पालकमंत्री काही पुढाकार घेत नाहीत आणि प्रश्न मात्र सुटत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. पंधरा दिवसाला एकदा नळाला पाणी येते म्हणजे फार भयंकर आणि असह्य असा प्रकार म्हणता येई.ल उशाला जळगाव शहर महानगरपालिका असताना, तेथे पाणी भरपूर असताना जळगाव महानगरपालिकेची जबाबदारी येते की पाणी द्यायला हवे. पण ते का पुरवले जात नाही? हा देखील मोठा प्रश्न आहे. आपल्या शेजारच्या उपनगरात पाणी देणे हे आपले कर्तव्य असताना ते का केले जात नाही? हा मोठा प्रश्न आहे. ग्राम पंचायत आणि शहर या दोघांच्या वादात बिचारे वाघनगरवासी मात्र पाण्यासाठी धडपडत आहेत. ते इतके वैतागले आहेत की आता मंत्रालयावरच मोर्चा न्यायचा तेव्हाच त्यांना आमच्या व्यथा कळतील. पाण्यासाठी काय हाल होतात ते कळेल, अन्यथा कळणार नाही. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी त्यांची अवस्था झालेली आहे. वाघ नगरला लागून असलेल्या जळगाव शहरवासियांना भरपूर पाणी उपलब्ध असताना त्यांच्या शेजारी वाघनगर मध्ये मात्र लोकांना पाणी मिळत नाही त्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत लागते. याला काय म्हणावे? तातडीने वाघनगरचा पाणी प्रश्न मिटवून त्यांना पाणी उपलब्ध करून देऊन त्यांच्या समस्या जळगाव शहर महानगरपालिकेने सोडवावी. पालकमंत्री काय करतील ते करतील.. ते काही करोत अथवा न करत.. पण वाघ नगर वासियांना पाणी मिळावे ही अत्यंत आवश्यक बाब आहे…!


