सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सुरक्षेच्या अभावी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि जीवन धोक्यात आले आहे. शाळेला संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार (गेट) नसल्याने शाळा परिसराचा वापर चक्क सार्वजनिक रस्त्यासारखा केला जात आहे, ज्यामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले आहे.

शाळेला कुंपण नसल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ शाळेच्या प्रांगणातूनच आपली वाहने आणि गुरेढोरे घेऊन जात आहेत. यामुळे शाळा परिसराचे रूपांतर एका मोकळ्या रस्त्यासारखे झाले आहे. मोकाट फिरणारी जनावरे थेट वर्गापर्यंत पोहोचत असल्याने शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. तसेच, शाळेच्या आवारात बिनदिक्कतपणे होणाऱ्या या वर्दळीमुळे विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असले तरी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळेच्या वर्गखोल्यांच्या छताला वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी झिरपत आहे. छताला पडलेल्या भेगांमुळे पावसाचे पाणी थेट वर्गात येत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त होत आहेत, तर शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात वर्गात बसणेही मुलांना कठीण झाले आहे.
शाळेतील फरशा खालून पोकळ झाल्यामुळे तिथे सापांनी आणि घुशींनी आपले बस्तान मांडले आहे. मागील काही दिवसांत अशा प्रकारे सापांचे दर्शन झाल्याने पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळेला सुरक्षित कंपाउंड नसल्याने गावकरी शाळेतील स्वच्छतागृहांचा वापर करत आहेत.
परिणामी, येथे प्रचंड अस्वच्छता पसरली असून ती नाममात्र उरली आहेत. पर्यावरण संवर्धनाचे धडे शाळेत गिरवले जातात, परंतु शाळा परिसरच असुरक्षित असल्याने या शिक्षणाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. शाळेची संरक्षक भिंत तातडीने बांधून, गेट बसवावे आणि वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून केली जात आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


