मोठी कारवाई : सुरक्षा यंत्रणा ॲक्शन मोडवर , 1500 जण ताब्यात

0

मोठी कारवाई : सुरक्षा यंत्रणा ॲक्शन मोडवर , 1500 जण ताब्यात

श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण खोऱ्यात तणावाचे वातावरण असून, सुरक्षा यंत्रणांनी व्यापक शोधमोहीम राबवत 1500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

दि. 22 एप्रिल रोजी घडलेल्या या हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर पहलगामसह संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमावर्ती पंजाब राज्यातही सतर्कता वाढवण्यात आली आहे.

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (23 एप्रिल) पहलगाम येथे घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पाइनच्या घनदाट जंगलांनी वेढलेल्या या भागात दहशतवादी कोणत्या मार्गाने पोहोचले, याची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांना देण्यात आली. हे पर्यटनस्थळ श्रीनगरपासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे.

दहशतवाद्यांना कठोर शिक्षा – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे कृत्य अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. धर्माच्या आधारावर पर्यटकांची हत्या करणे हे मानवीतेविरोधी असून, या हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. केवळ हल्लेखोर नव्हे, तर त्यांच्या मदतीला असलेल्या सर्वांना योग्य त्या शिक्षेला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.

मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश

या भीषण हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले व हेमंत जोशी, पुण्याचे संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे तसेच पनवेलचे दिलीप देसले या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे एस. बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोबीत पटेल हे हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारची तातडीची पावले

या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे राज्यात आणण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.