संतांचिये संगती : भाग २४

अंगी घेऊनिया वारे दया येती।
ऐशा भक्ता हाती चोट आहे॥१॥
देव्हारा बैसोनी हालविती सूपे।
ऐसे पापी पापे लिंपताती॥२॥
एकीबेकी न्याये येतसे प्रचीत।
तेणे लोक समस्त भुलताती॥३॥
तयाचे स्वाधीन दैवते असती।
तरी का मरती पोरे त्यांची॥४॥
तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा।
भक्त कान्होबाचा तो ही नव्हे॥५॥३२३५॥
क्षुल्लक दैवतांचे वारे अंगात भरुन जे लोकांवर दया करतात, अशा भक्तांच्या हातात चोट आहे. देव्हार्यावर बसून सूप हालवून जे शकुन सांगतात, ते पापी अशा पापाने लिप्त होतात। जसे मुले एकीबेकी खेळतात, तेव्हा साहजिकच हातातला डाव एखादे वेळेस ओळखतात, त्या न्यायाने, लोकांमधे एखाद्यास ह्या ढोंग्यांची प्रचिती येते। त्या योगाने सर्व लोक भुलतात। जर त्यांच्या स्वाधीन देव असते तर त्यांची पोरे का मेली असती? तुकाराम महाराज म्हणतात, जे तीर्थ, अंगारा देणारे ते श्रीकृष्णाचे भक्त नाहीत।
दाढी डोई मुंडी। मुंडूनिया सर्व।
पांघुरती बरवे वस्रे काळी॥१॥
ऊफराठी काठी घेऊनिया हाती।
उपदेश देती सर्वत्रांसी॥२॥
चाळवूनी रांडा, देऊनिया भेष।
तुका म्हणे त्यास यम दंडी॥३॥ ३०४७॥
मानभाव [महानभाव] पंथाचे लोक हे दाढी आणि डोके इत्यादिकांचे मुंडन करतात व अंगावर काळी वस्रे घेतात। उफराठी काठी हातात घेऊन सर्वांना उपदेश देतात। तुकाराम महाराज म्हणतात, रांडापोरांना फसवून ते आपला वेष त्यांना देतात। त्यांना यम शिक्षा करील.
लावूनिया मुद्रा बांधूनिया कंठी।
हिंडे पोटासाठी देशोदेशी॥१
नेसोनी कौपीन शुभ्रवर्ण जाण।
पहाती पक्वान्न क्षेत्रींचे ते॥२॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मईंद।
त्यापासी गोविंद नाही नाही॥३॥ ३०४९॥
गळ्यामध्ये रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळा कंठी बांधून व मुद्रा लावून पोटाकरीता देशोदेशी फिरतात। पांढरी लंगोटी नेसून ते क्षेत्रस्थ पक्वान्नांची वाट पाहात बसतात, असे तू समज। तुकाराम महाराज म्हणतात, असे हे मायिक मैंद (ढोंगी) आहेत. त्यांच्या जवळ गोविंद नाहीच नाही.
कान फाडोनिया मुद्रा ते घालिती।
नाथ म्हणविती जगामाजि॥१॥
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी
परि शंकरासी नोळखती॥२॥
पोट भरावया शिकती उपाय।
तुका म्हणे जाय नरकलोका॥३॥[३०४५]
कानाला भोके पाडून त्यात मुद्रा (कर्णभूषणे) घालतात व आपण नाथ आहोत असे ते जगात म्हणतात। ते गावामधे फेरे घालून बहुत द्रव्य मागतात, पण शंकराला मुळीच ओळखत नाहीत। तुकाराम महाराज म्हणतात, ते पोट भरण्याचे उपाय शिकतात व पुढे त्या योगाने नरक गतीस जातात.
कौडीकौडीसाठी फोडीताती शिर।
काढूनि रुधीर मलंग ते॥१॥
पांघरती चर्म लोहाची साखळी।
मारिती आरोळी धैर्यबळे॥२॥
तुका म्हणे त्यांचा नव्हेचि स्वधर्म।
न कळेचि वर्म गोविंदाचे॥३॥[३०४६]
मलंग [फकीर] हे कवडी कवडी करीता ठिकठिकाणी डोके फोडून रक्त काढतात। अंगावर कातडे घेऊन लोखंडाची साखळी गळ्यात घालतात व मोठ्या धैर्याने आरोळ्या मारतात। तुकाराम महाराज म्हणतात, हा त्यांचा स्वधर्म नाही व त्यांना गोविंद प्राप्तीचे खरे साधन कळत नाही.
वैद्य वाचविता जीवा, तरी कोण ध्याते देवा॥१॥
काय जाणो कैसी परी। प्रारब्ध ते ठेवी उरी॥२॥
अंगी दैवत संचरे, मग तेथे काय उरे॥३॥
नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती॥४॥
जाणे हा विचार। स्वामी तुकयाचा दातार॥५॥[१८७]
जर वैद्य औषध देऊन जीवाला वाचवील तर देवाचे भजन, ध्यान कोण करील? खरोखर कसा प्रकार आहे हे कळत नाही, पण जसे प्रारब्ध असेल तसे होते। जर खरोखर अंगात दैवताचा संचार होईल तर तेथे काही उरणार नाही। जर नवसाने मुले होत असती, तर स्रीला पती करण्याची गरजच काय?[नसती]। तुकयाचा स्वामी श्री विठ्ठल ह्याचा खरोखर काय विचार आहे, हे सर्व जाणतो.
डोई वाढऊनि केश। भूते आणिती अंगास॥१॥
तरी ते नव्हती संत जन। तेथे नाही आत्मखूना॥२॥
मेळवून नर नारी। शकुन सांगती नानापरी॥३॥
तुका म्हणे मैन्द नाही त्यापाशी गोवींद॥४॥३९२॥
डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भूते आणतात। पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण, आत्मानुभवाची खूण तेथे नसते. काही मूर्ख अनेक स्त्री- पुरुषांना एकत्र जमवून त्यांना नाना प्रकारचे शकून सांगतात। तुकाराम महाराज म्हणतात, असल्या मैंदांजवळ [लबाड-ढोंग्या जवळ]खरोखर गोविंद राहात नाही।४॥
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२


